“जसा आहार तसा विचार’ असे म्हटले जाते. माणूस जसा आहार घेतो तसेच त्याचे विचार आणि आचार असतात असे म्हटले जाते. माणसाचे आरोग्य आचार,विचार हे सर्व तो घेत असलेल्या आहारावरच अवलंबून असते. अन्न औषध म्हणून सेवन करा असे निसर्गोपचारात म्हटले आहे. आहार जर औषध समजून घेतला तर सर्व उपयुक्त घटकांचा समावेश आणि अपायकारक घटकांना निषिद्ध मानले तर शरीराची योग्य वाढ होण्याबरोबरच अनारोग्य दूर ठेवणे सहज शक्य आहे. म्हणूनच आहाराचे आरोग्य रक्षणातील महत्व अनन्यसाधारण असेच आहे.
आपल्या शरीरातच व्याधी रोखण्याची आणि निवारण्याची क्षमता असते. ही क्षमता आपल्या आहारावर अवलंबून आसते. शरीराची अंतर्गत क्षमता आहाराने वाढविणे, राखणे आणि त्यास योग्य निसर्गोपचाराची जोड देणे हाच आरोग्याचा खरा मूलमंत्र होय. सात्विक आहार असेल तर माणूसही सात्विक बनतो. तामसी माणसाचा आहार हा वेगळाच असतो. मांसाहार करणारा माणूस पशुतुल्य व्यवहार करतो. कारण जसा आहार तसा विहार. म्हणून आहार कोणता घ्यावा, किती घ्यावा, कां घ्यावा याचे शास्त्रीय ज्ञान असणे महत्वाचे आहे.
निसर्गोपचाराच्या सिद्धांतानुसार आपल्या पोटात अर्धा भाग अन्न, पावभाग पाणी आणि पावभाग हवा अशा प्रमाणातच आहार घेणे योग्य असल्याचे सांगितले आहे. यामुळे पचन अभिशोषण इत्यादी क्रिया उत्तम प्रकारे होऊन सेवन केलेले अन्न अंगी लागते. शिवाय त्यापासून काहीही अपाय होत नाही.