उत्पादनाबरोबर साखरेतही होणार घट; टनेज घटल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
खेड शिवापूर – सध्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतात ऊस उभा दिसत असला, तरी पावसामुळे बहुतांश पीक हातचे गेले आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात झालेल्या जोरदार पावसामुळे उसाचे क्षेत्र कमी झाले आहे. जिल्ह्यात सहकारी आणि खासगी असे एकूण जवळपास 18 साखर कारखाने आहेत. पुणे जिल्ह्यातील पूर्व, उत्तर भागात उसाचे दरवर्षी उत्पादन घेतले जाते.
यंदाच्या अवकाळी पावसामुळे उसाची लागवड कमी झाली आहे. त्याचप्रमाणे ऊस पिकाला मोठ्या प्रमाणात तुरे आल्याचे दिसून येत आहे. यंदा गळीत हंगाम उशिरा सुरू झाल्याने उर्वरित उसालाही तुरे फुटले आहेत. तुरे आल्यामुळे वजनात घट होत असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाचे टनेज घटल्याने आर्थिक नुकसान होणार आहे.
गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत यंदा सरासरी पावसाने जोरदार हजेरी लावली तसेच पावसाळ्यात जोरदार पाऊस पडल्यानंतर परतीच्या पावसाचा मुक्काम संपूर्ण तालुक्यात खूप दिवस राहिला. त्यातच शासनाने यावेळी गळीत हंगाम सुरू करण्यास उशीर लावला होता. गळितासाठी यंदा जाणाऱ्या उसाला 18 महिन्यापेक्षा जास्त कालावधी गेला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात उसाला तुरे फुटले आहेत. तुरा फुटल्याने वजनात होणारी घट व उसाच्या वाड्याचा वैरणीसाठी वापर होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाच्या उत्पादनात घट होतेच, त्याचबरोबर जनावरांच्या वैरणीचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
त्यामुळे या वर्षी बहुतेक उसाला आला तुरा-
या वर्षी ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात नेहमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे उसाच्या शेतात पाणी बरेच दिवस साठून राहिलेले होते. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये उसाला फुलकळी तयार होण्यास अनुकूल हवामान होते. त्यामुळे या वर्षी बहुतेक ऊसाला तुरा लवकर आणि जास्त प्रमाणात आला आहे. उसाच्या सर्व जातीमध्ये तुरा येण्याची क्षमता असते; परंतु जातीनुसार तुरा येण्याच्या प्रमाणात फरक आढळून येतो. काही जातींमध्ये लवकर तर काही जातींमध्ये तुरा उशिरा येतो. तुरा येण्याचे प्रमाण हे त्या उसाच्या जातीच्या अनुवंशिक गुणांवर अवलंबून असते.
ज्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवले जाते, पाण्याचा निचरा योग्य होत नाही, अशा पाणथळ जमिनीतील उसाला जास्त प्रमाणात तुरा येतो. उसाला तुरा आल्यानंतर उसाची वाढ पूर्णपणे थांबते आणि पक्वता वाढत जाते. तुरा आल्यानंतर साधारण एक ते दीड महिन्यात उसाची तोडणी झाली नाही, तर उसाला पांगशा फुटणे, दशी पडणे, वजन घटणे व साखर उतारा कमी होणे अशा प्रकारचे नुकसान होते.
-आदित्य बांडे हवालदार, शेतकरी.