पुणे – बहुचर्चित आणि बहूप्रतिक्षीत राज्यातील सत्ता संघर्षावर गुरुवारी (दि. 11) सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर मागच्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात पुणे जिल्ह्यातील कोणत्या आमदारांची वर्णी लागणार, लाल दिव्याच्या गाडी कोण्या वजनदार आमदाराच्या दारापुढे उभी राहणार? याबद्दल एकीकडे चर्चा सुरू झाली असताना दुसरीकडे, इच्छुकांकडून आपल्या “गॉडफादरांकडे लॉबिंग’ सुरू झाले आहे.
राज्यातील सत्ता संघर्षावर निर्णय होऊ द्या, मग मंत्रिमंडळ विस्ताराचे पाहु, असे सांगत इच्छुकांची बोळवण करून आजवर थोपवून धरण्यात आले. दरम्यान, अखेर न्यायालयाचा निकाल आला.दरम्यान, मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे भिजत घोंगडे काढा, असा नारा देत इच्छुकांमधून आता दबाव वाढू लागला आहे.
मंत्रिमंडळाच्या विस्तारात साधारण राज्यातील 23 चेहऱ्यांना संधी मिळू शकते. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला सहा ते सात आणि भाजपला 16 ते 17 मंत्रिपदे मिळू शकतात. पुणे जिल्ह्यातून दौंडचे आमदार राहुल कुल, खडकवासला विधानसभेचे आमदार भीमराव तापकीर यांच्यासह जिल्ह्याच्या हद्दीलगत असलेल्या अकलूज (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील विधानपरिषदेवर गेलेले आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांची नावे भाजपकडून चर्चेत आहेत.
कुलांच्या डोक्यावर फडणवीसांचा हात!
आमदार राहुल कुल हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुकमधील तर आहेतच शिवाय त्यांच्या जवळीलही मानले जातत. त्यातच कुल यांना लवकरच “लाल दिवा’ मिळेल असे आश्वासन जनतेला फडणवीस यांनी दिले होते. त्यातच कुल हेही मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा असल्यने त्यांना मंत्रिपद देण्यात देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात, यावर बरेच काही अवलंबून आहे.
तापकीरांना कामाची पोचपावती?
भीमराव तापकरी यांचे खडकवासला विधानसभा मतदारसंघात काम चांगले असून मतदारसंघ भाजपमय करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्याचबरोबर तापकरी आमदार झाल्यापासून कायमच या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे मतदान घटले आहे, याचेच फळ म्हणून तापकीर यांची मंत्रिपदावर वर्णी लागणार का, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
“त्यातून’ रणजितसिंह मोहिते-पाटलांना मंत्रिपद?
सोलापूर जिल्ह्यात आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समित्या, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, जिल्हा दूध संघ व इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे मोहिते पाटील यांना ताकद देऊन सहकार क्षेत्रावर राष्ट्रवादीचे असलेले वर्चस्व मोडीत काढण्याचा भाजपश्रेष्ठींचा मनसुबा आहे, त्यातून रणजितसिंह पाटील यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.