खेड – यात्रा जत्रा, वाढदिवस, विवाहसोहळे आदींच्या कार्यक्रमात मोठमोठ्या डीजेच्या कर्कश आवाजाने अनेकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. अनेकवेळा या मोठ्या आवाजाच्या स्पर्धा सुरू झाल्यामुळे अनेक डीजे एकाच जागेवर आणून सर्वात मोठा आवाज कुणाचा? हे सिद्ध करण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. या डीजेच्या आवाजाने अनेकांचा काळजाचा ठोका चुकत आहे. याकडे पोलीस यंत्रणेचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.
एकेकाळी पारंपरिक वाद्याने पार पडणाऱ्या अनेक उत्सवांची जागा जीवघेण्या डीजेने घेतली. मिरवणुका आणि अनेक धार्मिक कार्यक्रमात हालग्या, सुंबळ, लेझीम, सनई, ढोलताशा ही वाद्ये आवर्जून असायची, या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होत होत्या.आता मात्र ही परिस्थिती बदलली आहे. डिजेचा एकच ऑपरेटर हजारो नागरिकांना आवाजाच्या ठोक्याने क्षणात घायाळ करत असल्याची वस्तुस्थिती आहे. अनेक लग्न समारंभात तसेच यात्रा उत्सवात अबाल वृद्ध, लहान मुले, अनेक आजारांवर उपचार सुरू असलेले रुग्ण सहभागी असतात.
अशावेळी कानठळ्या बसणाऱ्या आणि काळजाचे ठोके चुकणाऱ्या आवाजाने अनेकांना मोठा त्रास होत आहे. डीजेच्या आवाजावर नियंत्रण असणे गरजेचे आहेच, डीजे रात्री किती वेळेपर्यंत वाजवावा? यावरही नियंत्रण असणे गरजेचे आहे, मात्र सध्या यावर कुणाचेही नियंत्रण असल्याचे दिसून येत नाही. अनेक गावांत यात्रा उत्सवात तरुणांचे चार-पाच वेगवेगळे गट तयार होत असून सर्वात कोण भारी? हे गावाला दाखवण्याची स्पर्धा सुरू असते मग प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणाहून आर्थिक भडिमार करून नामांकित डीजे बोलावून मोठ्या आवाजात जोरदार शक्तीप्रदर्शन करतात.
यामुळे सामाजिक स्वास्थ्य तर बिघडतेच पण वादविवादाची ठिणगी पेटते. कर्कश आवाजाने अनेकांचे बळी गेल्याची उदाहरणे आहेत. अशा ठिकाणी पोलीस फिरकताना दिसत नाहीत. गावातील स्थानिक यात्रा कमिटीने विविध कार्यक्रम, मिरवणुका, लग्नसमारंभ, वराती, वाढदिवस आदी प्रसंगी डीजेच्या आवाजावर निर्बंध ठेवण्यावर लक्ष देणे आवश्यक आहे. याबाबत अनेकवेळा जनजागृती झाली तर निश्चित याचा परिणाम दिसून येईल.