हातातोंडाशी आलेल्या पिकांच्या नुकसानीमुळे बळीराजा संकटात
कराड – पावसाळ्याचा कालावधी संपला असतानाही पाऊस काही थांबायचे नाव घेत नसल्याने वेळी-अवेळी पडणाऱ्या या पावसामुळे कराड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात दाणादाण उडवली आहे. पावसामुळे भुईमूग, सोयाबीन, भात पिकांच्या काढणीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक पिके भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतीला जणूकाही अवेळी पावसाची साडेसातीच लागल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी बांधवांमधून व्यक्त होत.
कराड तालुक्यातील येळगाव, ओंड, उंडाळे, काले, वाठार, रेठरे बुद्रुक, कार्वे, मलकापूर, सैदापूर, मसूर, पाडळी, उंब्रज, कोळे, कुसूर, तांबवे तर पाटण तालुक्यात नवजा, कोयनानगर, हेळवाक, मोरगिरी, नवारस्ता, मल्हारपेठ, ढेबेवाडी, चाफळ, उरुल, पाली व तारळे भागात पावसाने मोठे नुकसान केले आहे. तसेच महाबळेश्वर, पाचगणी, सातारा, जावली, वाई, कोरेगाव, फलटण, खंडाळा यासह माण-खटाव दुष्काळी भागातही परतीच्या पावसाने हाहाकार माजला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी आस्मानी संकटात सापडला आहे. पावसामुळे शेतीसह पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
वेधशाळेने यावर्षी वर्तवलेल्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रात तुफान पाऊस असून पावसाने सरासरी ओलांडत नवे रेकॉर्ड तयार केले आहे. या अतिवृष्टीमुळे सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये महापूर आला. यामध्ये लोकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. यानंतर तरी पाऊस उसंत घेईल असे वाटत होते. काही दिवस पावसाने उघडीप दिलीही. मात्र परतीचा पाऊस ही पावसाळ्यासारखा बरसत असल्याने याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
या परतीच्या पावसामुळे व वादळामुळे पडत असलेल्या पावसाने भुईमूग, सोयाबीन, ऊस व भात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतल्याने ऐन सणासुदीच्या दिवाळे काढले आहे. नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतात गुडघाभर पाणी साचल्याने पिके काढताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.शासनाने नुकसानीचे पंचनामे करुन तातडीने मदत द्यावी, अशी मागणी आता शेतकरी वर्गातून होत आहे.
शेतात सोयाबीनची लागवड केली होती. पाऊस चांगला पडला. पीक हातातोंडाशी आले होते, मात्र परतीच्या पावसामुळे माझ्या शेतात गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे सोयाबीनचे पीक बऱ्याच प्रमाणात कुजले आहे. त्यातच त्या गुडघाभर पाण्यात आम्ही सोयाबीन काढले. मात्र शेतात घातलेला पैसा काढलेल्या पिकात निघतो की नाही? याची चिंता लागून राहिली आहे.
चंद्रकांत पाटील, शेतकरी