भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 वर्षे पूर्ण केली. या खास प्रसंगी त्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करून आपला आनंद व्यक्त केला. जडेजाने त्याच्या इन्स्टा हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये त्याने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून आतापर्यंतच्या प्रवासाचा उल्लेख केला आहे.
जडेजाने शेअर केली एक भावनिक पोस्ट..
स्टार क्रिकेटरने 8 फेब्रुवारी 2009 रोजी कोलंबो येथे श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिल्या सामन्यात जडेजाने नाबाद 60 धावा करत संघाला विजयाकडे नेले. त्याने आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले, त्यानंतर दोनच दिवसांनी त्याला टी-20 संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली.
15 years of living my dream – grateful for every moment! 🇮🇳🏏 pic.twitter.com/IRiOnDWkj0
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) February 8, 2024
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जडेजाने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्याने एका व्हिडीओद्वारे त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. यासोबत जडेजाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझे स्वप्न जगण्याची 15 वर्षे – प्रत्येक क्षणासाठी कृतज्ञ!”
हैदराबाद कसोटीत अष्टपैलू खेळाडूला झाली होती दुखापत…
या डावखुऱ्या फलंदाजाला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी तीन वर्षे वाट पाहावी लागली. 13 डिसेंबर 2012 रोजी त्याने इंग्लंडविरुद्ध या फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. भारतासाठी 69 कसोटी, 197 एकदिवसीय आणि 66 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला जडेजा इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याचा भाग होऊ शकला नाही. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात तो हॅमस्ट्रिंगच्या समस्येचा (दुखापत) बळी ठरला, त्यामुळे त्याला विशाखापट्टणममध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात विश्रांती देण्यात आली. सध्या तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे BCCI वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
तिसऱ्या कसोटीत पुनरागमन शक्य…
या मालिकेतील पहिल्या सामन्यात जडेजाने एकूण पाच विकेट्स घेतल्या होत्या. याशिवाय त्याने इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात 87 धावांची शानदार खेळी केली होती. त्याचवेळी, दुसऱ्या डावातही तो नाबाद सहा धावा करून नाबाद राहिला. मात्र, भारताने हा सामना 28 धावांनी गमावला. या मालिकेतील उर्वरित सामन्यांसाठी बीसीसीआय लवकरच टीम इंडियाची घोषणा करू शकते ज्यामध्ये रवींद्र जडेजा पुनरागमन करू शकतो.