Loksabha 2024 – लोकसभा निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. युतीच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. नितीशकुमार एनडीएमध्ये परतले आहेत.त्यानंतर भाजपने पुन्हा एकदा आपल्या युतीतील जुन्या सहकाऱ्यांना सोबत घेण्यासाठी बोलणी सुरु केली आहेत. पंजाबमध्ये देखील अकाली दल भाजपसोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासह दक्षिण भारतात देखील भाजपने आगामी लोकसभेसाठी आपली तयारी सुरु केली आहे. ज्यामुळे आता एनडीएचा आणखी एक पक्षही पुनरागमन करण्यास उत्सुक आहे.
तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांनी नुकतीच दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. यादरम्यान आंध्र प्रदेशातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी त्रिपक्षीय निवडणूक युती करण्याबाबत बोलणी झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, टीडीपी अध्यक्ष निवडणुकीपूर्वी भाजपशी युती करण्यास उत्सुक आहेत आणि अनेक भाजप नेत्यांचा असा विश्वास आहे की नायडूंसोबत भागीदारी वायएसआर काँग्रेस शासित राज्यात एनडीएला चांगली कामगिरी करण्यास मदत करेल. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की त्यांचा पक्ष युतीसाठी तयार आहे, परंतु हे सर्व राज्याचा मुख्य विरोधी पक्ष टीडीपी विशेषत: लोकसभा निवडणुकीसाठी किती जागा देण्यास सहमत आहे यावर अवलंबून असेल.
TDP 2018 साली NDA पासून वेगळे झाले
युतीची चर्चा अद्याप प्राथमिक टप्प्यात असली तरी नायडू एनडीएमध्ये परतले तर सत्ताधारी आघाडी मजबूत करण्यात भाजपप्रणित आघाडीचे हे दुसरे यश असेल. कारण नुकतेच नितीश कुमार देखील एनडीएमध्ये दाखल झाले आहेत. TDP 2018 मध्ये NDA पासून वेगळे झाले होते, त्यानंतर त्यांनी 2019 च्या निवडणुका एकट्याने लढवल्या होत्या आणि त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
या निवडणुकांमधील पराभवानंतर टीडीपीने पुन्हा एनडीएसोबत एकत्र येण्याचे प्रयत्न सुरू केले होते. चंद्राबाबू नायडू यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये अमित शहा आणि नड्डा यांची भेट घेतली होती. 2018 मध्ये TDP च्या NDA मधून बाहेर पडल्यानंतर नायडू यांची ही अमित शहांसोबतची पहिली भेट होती. मात्र तेव्हा भाजप नायडूंच्या प्रस्तावांबद्दल उदासीन होता, कारण YSRCP ने मोदी सरकारशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले होते आणि अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी संसदेत पाठिंबा दिला होता.