नवी दिल्ली – भारतासह जगभरामध्ये सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाने थैमान घातले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील ‘कोरोना ‘ची गंभीर दखल घेतली असून या आजारास जागतिक महासाथ घोषित केले आहे. कोरोना विषाणूचा उगम आशिया खंडातील चीनमध्ये झाला असून यामुळे खंडातील इतर देशांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे.
अशातच सार्क या दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकार्य संस्थेने कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर एक बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गापासून आपापल्या देशांना दूर ठेवण्यासाठी परस्पर सहकार्य करण्याबाबत चर्चा झाली. मात्र येथे देखील पाकिस्तानने काश्मीर प्रश्नाचा मुद्दा उपस्थित करत बैठकीच्या मूळ हेतूला हरताळ फासण्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यान, याबाबत आता भारताने पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पाकिस्तानच्या या कृत्याबाबत बोलताना, “सार्कची बैठक कोरोनाच्या महासाथीबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित केली होती. मात्र पाकिस्तानने मानवता जपणाऱ्या या व्यासपीठाचा गैरवापर केला.” अशा शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला.
Raveesh Kumar, MEA on Pakistan raising Kashmir in SAARC COVID19 video conference: This SAARC platform was to address this pandemic. It was a humanitarian platform that Pakistan misused. pic.twitter.com/97z0q4qnL7
— ANI (@ANI) March 19, 2020