वालचंदनगर- करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून शहरी तसेच ग्रामीण भागातील यात्रा, उत्सव, धार्मिक कार्यक्रमावर बंदी घातली आहे. याचाच एक भाग म्हणून वालचंदनगर ग्रामपंचायतीने गुरूवार (दि. 19)चा आठवडे बाजार रद्द केल्याने परिसरात शुकशुकाट होता. इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथे गुरुवारचा आठवडे बाजार असतो.
या आठवडे बाजारात वालचंदनगर परिसरातील अनेक गावांमधील ग्रामस्थ व व्यापारी मोठ्या प्रमाणात येत असतात; परंतु करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा भाग म्हणून यांनी जमावबंदीचा आदेश लागू केला, त्यामुळे वालचंदनगर ग्रामपंचायतीच्या वतीने करोना आजाराबाबत सूचना देत हा बाजार बंद ठेवण्यात आला. बाहेरगावच्या व्यापाऱ्यांना या निर्णयाची फारशी कल्पना नव्हती, त्यामुळे अशा व्यापाऱ्यांना वालचंदनगर येथे येऊन आल्यापावली परतावे लागले. करोनाची साथ आटोक्यात आल्यानंतर बाजार नियमीत भरविण्यात येणार आहे, असे आवाहन वालचंदनगर ग्रामपंचायतीने केले आहे.