मुंबई – खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावर मुंबईच्या सत्र न्यायालयात असलेल्या खासदार-आमदार न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. राणा दाम्पत्याच्या वतीने ज्येष्ठ वकील रिझवान मर्चंट आणि आबाद पोंडा न्यायालयात पोहोचले. शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान पोलिसांनी जबाब नोंदवताना राणा दाम्पत्याच्या जामिनाला विरोध केल्याची माहिती आहे.
राणा यांच्या वकिलाने सुनावणीदरम्यान सांगितले की, हे प्रकरण चर्चा कऱण्यासारख नाही. राणा दाम्पत्य हे लोकप्रतिनिधी असून ते कुठेही पळून जाणार नाही. त्यामुळे त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेऊ नये. या दाम्पत्याला 8 वर्षांची मुलगी आहे. दोघांवर काही अटी लादल्या जाऊ शकतात पण त्यांना सोडायला हवं.
तसेच राणा दाम्पत्य मातोश्रीवर एकटेच गेले होते. त्यांच्यासोबत एकही कार्यकर्ता नव्हता. हिंसाचार करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. उलट सरकारच्या समर्थकांकडूनच आंदोलने केल्याचं राणा यांच्या वकिलांनी म्हटलं.
दुसरीकडे राणा दाम्पत्याने पोलिसांच्या आदेशाचे पालन केले नसल्याच्या कारणावरून सरकारी वकिलांनी राणा दाम्पत्याच्या याचिकेला विरोध केला आहे. शिवाय राणा दाम्पत्याच्या मातोश्री भेटीमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते, अशी माहिती त्यांना आधीच मिळाली होती. आता नियम पाळणारा माणूस असता तर त्याने निर्णय बदलला असता. पण या लोकांनी घटनेत दिलेल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचं वकिलांनी म्हटलं.
सरकारी वकील एवढ्यावरच थांबले नाही. सध्या देशात हिंदू कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. आरोपी राणा दाम्पत्याला देखील वाटलं की, हिंदू कार्डचा वापर करून महाराष्ट्र सरकारला बदनाम करता येईल. मात्र सरकार कोणत्याही एका धर्मासाठी काम करत नाही, असंही सरकारी वकिलांनी आपल्या युक्तीवादात म्हटलं.