विकासात बोटे घालणाऱ्यांची बोटे मोडल्याशिवाय राहणार नाही
फलटण – साखरवाडी येथील कारखान्याचा प्रश्न संपल्यात जमा असून येथील ऊस उत्पादक शेतकरी, कामगार यांना तात्पुरती नव्हे तर कायमस्वरुपी दिवाळी देणार असून तालुक्याच्या विकासात विनाकारण बोटं घालणाऱ्यांची बोटं मोडल्याशिवाय राहणार नाही, लोकसभेत निवडुन गेलेले खासदार हे माळशीरसचे असून मी असेपर्यंत ही फलटणची जनता स्वीकारू शकत नाही, अशा शब्दात विरोधकांना फटकारले. दरम्यान भर पावसातही सभेतून जागेवरुन न हललेली विराट गर्दीची चर्चा चांगलीच रंगली.
फलटण विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार दीपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या साखरवाडी येथील सभेत रामराजे यांनी चांगलीच शाब्दिक फटकेबाजी केली. यावेळी बाजार समितीचे अध्यक्ष रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महानंदा दुध संघाचे उपाध्यक्ष डी. के. पवार, जिल्हा परिषद सदस्य दत्ता अनपट, पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा धुमाळ, उपसभापती शिवरुपराजे खर्डेकर, माजी सभापती रेश्मा भोसले, शामराव भोसले, श्रीरामचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, शंकरराव माडकर, भगवानराव होळकर, विनायक पाटील, विक्रम भोसले, राजेंद्र भोसले, नितिन भोसले, सतिश माने आदींची यावेळी उपस्थिती होती.
ही विधानसभा निवडणूक तालुक्याचे भवितव्य ठरविणारी ऐतिहासिक निवडणूक होणार आहे. त्यामुळे अंतर्गत गटबाजीस फाटा देत एकसंध होउन दीपक चव्हाण यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन करुन रामराजे म्हणाले, साखरवाडी कारखान्याचा प्रश्न सुटल्यात जमा आहे. हा प्रश्न कोर्टात असल्याने एखादा दिवस मागेपुढे झाला तरी येत्या 14 तारखेला हा विषय कायमस्वरुपी संपेल याची खात्री देतो.
पुढील काळात कारखाना हा राजकारणविरहितच चालवायला लागणार आहे. म्हणून बाहेरुन इथं आलेली मंडळी व्यावसायिक दृष्टिकोन असलेली आहेत. त्यामुळे ती चुकूनही राजकारणात पडणार नाहीत व हा कारखाना कारखान्यासारखाच चालेल. त्यामुळे पुन्हा आयुष्याचा शिमगा करुन घ्यायचा नसेल तर सव्वासहा फूटी राक्षसरुपी भुक्कड खासदाराला घरी घालवा असेही त्यांनी उपस्थितांना सांगितले. सभेला पाऊस असूनही मोठ्या प्रमाणात गर्दी होती, यामध्ये तरुणांचे प्रमाण लक्षणीय होते.