मुंबई – मनसे अध्यक्ष ‘राज ठाकरे’ यांचे निवास्थान म्हणजेच ‘कृष्णकुंज’ हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे प्रमुख केंद्र राहिले आहे. ही वास्तू अनेक महत्त्वपूर्ण राजकीय निर्णयाची साक्षीदार राहिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये ‘कृष्णकुंज’ला विशेष महत्व आहे.
दरम्यान, आता लवकरच राज ठाकरे कृष्णकुंज सोडणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज ठाकरे हे दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर नव्या घरात प्रवेश करणार आहे. राज ठाकरे यांचे नवे घर दादर येथील त्यांचे सध्याचे निवासस्थान असलेल्या ‘कृष्णकुंज’ शेजारीच आहे.
‘कृष्णकुंज’ शेजारीच नवी पाच मजली इमारत बांधण्यात आली असून, राज ठाकरे लवकरच आपल्या संपूर्ण कुटूंबासह नवीन घरात प्रवेश करणार आहेत. ही नवी इमारत सर्व सुविधांनीयुक्त असून, यामध्ये भव्य ग्रंथालय देखील उभारण्यात आलं आहे.
आता याच पाच मजली इमारतीत पहिल्या मजल्यावर समिती कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर यामध्ये मनसेचे मुख्य कार्यालय देखील येथेच असणार आहे. याच ठिकाणी राज ठाकरे हे आपल्या कार्यकर्त्यांना भेटणार आहेत, तसेच जनतेचे इतर प्रश्न सोडवतील. पुस्तक प्रेमींसाठी इमारतीत एक भव्य ग्रंथालय देखील असणार आहे.