टाकळी हाजी -पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले. यंदा वर्षी मागील वर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण खूपच कमी असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आंबेगाव व शिरूर तालुक्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यातालुक्यातील धरण क्षेत्रात पावसाने दडी मारल्याने सर्व धरणांमध्ये जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे यापुढील काळात पाऊस पडला नाही तर मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
सध्या धरण क्षेत्रातील उपलब्ध पाणीसाठा पुढीलप्रमाणे – येडगाव (39.35 टक्के), माणिकडोह (17.66 टक्के), वडज (49.58 टक्के), पिंपळगाव जोगे (16.91 टक्के), डिंभे (47.85 टक्के) इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षाच्या तुलनेत डिंभे धरण साखळीतील सध्याचा उपयुक्त पाणीसाठा (30.74 टक्के) इतका आहे. मागील वर्षी तोच पाणीसाठा (87.15 टक्के) इतका होता. आजच्या तुलनेत खूपच कमी पाणीसाठा शिल्लक आहे.
पाऊस जर झाला नाही तर हाच पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवावा लागेल. पाण्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, अशी माहिती नारायणगावचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर व सुहास साळवे यांनी दिली.
पावसाअभावी पाण्याचे संकट येण्याची शक्यता
सध्या करोनाच्या साथीमुळे शेतकऱ्यांची पिके व बाजारभाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यावर्षी पावसाअभावी धरणे भरली नसल्याने पुढील काळात शेतकरी व जनतेवर खूप मोठे संकट येणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे कमी कालावधी व कमी पाणी लागणारी पिके घ्यावीत. पिकांसाठी पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे.
धरण क्षेत्रात पाऊस झाला नसल्याने पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते. पुढील काळातील रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पिकांचे योग्य नियोजन करावे लागेल.पाऊस झाला नाही तर सर्वांसाठी चिंतेची बाब आहे. पाऊस झाला तर चांगली परिस्थिती निर्माण होईल.
– दिलीप वळसे पाटील, कामगार व उत्पादन शुल्क मंत्री.
सध्या ज्या भागात पाऊस पडत आहे, तिथे नद्यांना थोड्या प्रमाणात पाणी आहे. परंतु धरण क्षेत्रात पाऊस नसल्याने पाण्याअभावी पुढील काळात दुष्काळाचा सामना करावा लागेल.
– पोपटराव गावडे, माजी आमदार शिरूर.