गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये भारतासह संपूर्ण जगाला मोठ्या प्रमाणात विळखा घातलेल्या करोना विषाणूच्या महासंकटावर मात करण्यासाठी विविध देशांमध्ये लस निर्मितीचे प्रयोग सुरू असतानाच रशियाने दोन दिवसांपूर्वी लसीचा शोध लावल्याचा दावा केला. करोनाच्या महासंकटाने त्रासलेल्या संपूर्ण जगासाठी ही एक गुड न्यूज किंवा दिलासादायक बातमी असली तरी जगात सर्वत्रच या बातमीचे स्वागत मनापासून झाले, असे म्हणता येत नाही.
कारण संपूर्ण जगालाच ग्रासून टाकलेल्या करोनाच्या लसीकरणालाही राजकारणाने ग्रासून टाकले आहे. खरे तर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन लस शोधल्याचे जाहीर केले. पुतीन यांनी स्वतःच्या मुलीवर या लसीचा प्रयोग केला आहे. रशियातील आरोग्य मंत्रालयानेही या लसीला हिरवा कंदील दिला आहे आणि लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याचे आदेशही दिले आहेत; पण जगात पुन्हा महासत्ता बनू पाहणाऱ्या रशियाला करोनावरील लस निर्माण करण्याचे प्रथम श्रेय मिळू नये म्हणूनच कदाचित या लसीच्या निर्मितीबाबत आणि प्रभावीपणाबाबत शंका घेतल्या जात आहेत. खूपच कमी लोकांवर प्रयोग करून या लसीचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले असून या निष्कर्षांवर विश्वास ठेवून जर लोकांना ही लस टोचली तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनेही या लसीबाबत शंका व्यक्त केली आहे. करोना महासंकटाच्या कालावधीमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने केलेले काम तुटपुंजे आणि निष्प्रभ असले तरी अद्यापही जागतिक स्तरावर या संघटनेच्या निष्कर्षांना आणि शिफारशींना मान्यता असल्याने रशियाने निर्माण केलेल्या या करोना लसीबाबत संशय वाढवण्याचे काम झाले आहे. जगात सर्वत्र करोना विषाणूचा धुमाकूळ सुरू असताना बाजारावर लक्ष ठेवून सर्वच भांडवलशाही देशांमध्ये लस निर्मितीचे प्रयोग सुरू झाले होते. जगात सर्वात प्रथम लस शोधणाऱ्या आणि त्याचे उत्पादन सुरू करणाऱ्या देशाला किंवा त्या देशातील कंपनीला मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा होणार आहे, हे गृहीत असल्यानेच रशियाच्या लसीकरणाच्या दाव्यानंतर हे राजकारण सुरू झाले आहे.
काही दिवसांपूर्वी पतंजली उद्योगाचे सर्वेसर्वा रामदेव बाबा यांनी करोनावरील औषधाची घोषणा केल्यानंतर भारतात ज्या प्रकारे मतमतांतरे सुरू झाली होती, त्याच प्रकारे आता रशियाच्या घोषणेनंतर जागतिक पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. अर्थात, रामदेव बाबा यांनी देशाच्या आरोग्य खात्याची कोणतीही परवानगी न घेता थेट आपल्या औषधाची घोषणा केली होती. या प्रकरणावरून न्यायालयानेही रामदेव बाबा यांना तंबी दिली होती; पण रशियाबाबत असे काही झाले नाही. रशियात गेले काही महिने लसीवर प्रयोग सुरू होते. या प्रयोगाला यश मिळाल्यानंतर आरोग्य खात्याची परवानगी घेऊन तेथील आरोग्य खात्याने हिरवा कंदील दिल्यानंतरच रशियाच्या नेत्यांनी लसीची घोषणा केली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या लसीचा वापर सध्या फक्त रशियातच करण्यात येणार आहे, असेही पुतीन यांनी स्पष्ट केले आहे. असे असतानाही रशियाच्या या लसीबाबत शंका घेणे निश्चित जागतिक राजकारणाचा आणि अर्थकारणाचा एक भाग मानावा लागतो.
जगातील बहुतेक सर्वच देशांना करोना विषाणूने ग्रासून टाकले असल्याने सध्याच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण जगाला या लसीचा पुरवठा करणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य होणार नाही, याची कल्पना असल्यानेच रशियाने या लसीचा वापर फक्त देशातच करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. खरे तर त्यामुळे अमेरिका, ब्रिटन किंवा इतर देशांना असुरक्षित वाटण्याचे काहीच कारण नाही. पण या निमित्ताने रशिया पुन्हा एकदा महासत्तेच्या दिशेने वाटचाल करण्याची भीती अमेरिकेला आणि अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांना वाटत असल्यानेच रशियाच्या या संशोधनाबाबत संशय व्यक्त केला जात आहे. अर्थात, केवळ संशय व्यक्त करून काही होणार नाही. रशियाने खरोखरच प्रभावशाली लसीचा शोध लावला असेल तर त्याचा उपयोग संपूर्ण जगाला व्हावा, यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने पुढाकार घेण्याची गरज आहे. याबाबत जे काही नियम आहेत त्या नियमांचा आधार घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने रशियाच्या या संशोधनाबाबत निर्णय घेण्याची गरज आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक पाठवून आणि संशोधन करणाऱ्या इतर देशातील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन अंतिम निर्णय घेण्याची गरज आहे. केवळ रशियाने सर्वात प्रथम या लसीवर संशोधन केले आणि लसीचा शोध लावला म्हणून संशय घेणे योग्य ठरणार नाही. रशियासारखा देश लवकरच या संशोधनाचा सर्व तपशील जगासाठी जाहीर केल्याशिवाय राहणार नाही. कोणत्याही एखाद्या किरकोळ राजकीय विषयांमध्ये ज्याप्रमाणे श्रेयवादाचा विषय समोर येतो आणि विनाकारण वाद निर्माण होतात, त्याप्रमाणे या लसीबाबत होणे योग्य ठरणार नाही. भारतासह जगातील अनेक देशांमध्ये लसीचे संशोधन सुरू आहे. भारतातील लसही अंतिम टप्प्यात आल्याचे सांगितले जात आहे. आता भारतासह अनेक देश लवकरच याबाबत घोषणा करू शकतात.
दरवेळी त्यामध्ये राजकारण येणे सध्याच्या काळात जगाला परवडणारे नाही. कोणताही एक देश संपूर्ण जगासाठी लसीची गरज भागवू शकत नाही, हे लक्षात घेऊनच या विषयावर जागतिक सहकार्य महत्त्वाचे ठरू शकेल. रशियाने या विषयात आघाडी घेतली असली तरी इतरही देश नजीकच्या काळात यश मिळवू शकतात. संपूर्ण जगाचा आर्थिक गाडा ठप्प करणाऱ्या करोना विषाणूच्या महासंकटाशी यशस्वी मुकाबला करायचा असेल तर लवकरात लवकर लस बाजारात येणे आवश्यक आहे. लस कोणी आणली, हा प्रश्न व्यवहार्य ठरत नाही. त्यामुळे रशियाच्या संशोधनाचे स्वागत करूनच इतर देशांनी आपापल्या पातळीवर हे संशोधन पुढे नेण्याची गरज आहे. भारतात सध्या सुरू असलेले प्रयोग पाहता भारतही आघाडी घेईल, अशी अशा सध्या निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत भारतालाही जगाचे आणि जागतिक आरोग्य संघटनेचे सहकार्य लागणार आहे. “कोणाच्याही कोंबड्याने का होईना उजाडायला हवे’, या मराठी म्हणीवर विश्वास ठेवूनच करोना लसीवरील संशोधनाकडे पाहायला हवे.