नवी दिल्ली : देशातील उत्तरेकडे असणाऱ्या अनेक राज्यांमध्ये सोमवारपासूनच वेगळ्याच वातावरणाची निर्मिती झाल्याचे पहायला मिळते. उत्तरेकडील राज्यांच्या मैदानी भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर, पर्वतीय भागांमध्ये तापमानात कमालीची घट झाली आहे.
बहुतांश ठिकाणी बर्फवृष्टीही झाली आहे. बर्फवृष्टी झाल्यामुळे जम्मू काश्मीर येथील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग आणि मुघल रोड बंद झाले. परिणामी सलग दुसऱ्या दिवशी काश्मीरचा देशाच्या इतर भागांशी असणारा संपर्क तुटला.
काश्मीरचा पारा सातत्याने खाली जात असतानाच राजधानी दिल्लीवर मात्र पावसाचा शिडकावा सुरु आहे. तसेच काही भागांत गारपीटही पाहायला मिळाली. हवामान खात्याच्या माहितीनुसार सलग तिसऱ्या दिवशी दिल्लीत अवकाळी पाऊस झाला. ज्याचे थेट परिणाम तेथील तापमानावर दिसून आले.
#WATCH Parts of #Delhi witnesses spells of rain and hailstorm; visuals from south Delhi pic.twitter.com/MFdUjBXlOs
— ANI (@ANI) January 6, 2021
उत्तराखंडमध्ये असणाऱ्या गढवाल आणि कुमाऊँ या उंच पर्वतरांगांमध्ये मंगळवारी जोरदार बर्फवृष्टी झाली. कर, काही भागांत पाऊसही पाहायला मिळाला. ज्यामुळे इथे थंडीचे प्रमाणही मोठ्या फरकाने वाढले. केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, मुनस्यारी या भागांमध्ये बर्फाची चादरच तयार झाली. तिथे पंजाब आणि हरयाणामध्येही थंडीचा कडाका पाहायला मिळाला. तर, राजस्थानमध्ये मात्र बहुतांश भागात पावसाचा शिडकावा झाला. महाराष्ट्रातही चित्र काही वेगळे नव्हते.
Cloudy sky over Maharashtra as seen from latest satellite image at 11.50 pm 5 Dec.
Pune reports intermittent light rains at isolated places now. pic.twitter.com/QAhGExOOEj— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 5, 2021
मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. याचा थेट परिणाम इथल्या तापमानावर आणि शेती व्यवसायावर झाला. पुढील काही दिवसांसाठीही इथं अशाच प्रकारच्या वातावरणाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम किनारपट्टीवर द्रोणीय स्थितीचा (ट्रफ) परिणाम आगामी ३ दिवस टिकून राहण्याची शक्यता आहे. हवामानात सातत्यानं होणाऱ्या या बदलांमुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन संबंधित प्रशासकिय यंत्रणांकडून करण्यात येत आहे.