मुंबई : मुंबईमध्ये झालेल्या जोरदार पावसाने अनेक ठिकाणी पाणी भरले होते. आज देखील मुंबईमध्ये हायअलर्ट देण्यात आलेला आहे. मुंबईसह नवी मुंबई रायगड, पालघर, ठाणे या विभागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यातच आज 11.40 वाजता 4.57 मीटर एवढी हायटाईड देखील आहे. यामुळे 15 फुटापर्यंत लाटा समुद्रात उसळण्याची शक्यता आहे. याच वेळी जर जोरदार पाऊस झाला तर मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.
मुंबईला काल पावसाने झोडपल्यानंतर आजदेखील मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काल दिवसभरात तब्बल 156 मिमी पावसाची मुंबईत नोंद झालीय. आज हवामान खात्याने मुंबईसोबतच पालघर, ठाणे, रायगड नाशिक या जिल्ह्यांला रेड अलर्ट दिला आहे. या संपूर्ण परिस्थिती नंतर आता एकच प्रश्न उरतो की काल ज्याप्रमाणे मुंबईतील अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साठले होते. काल सारखी परिस्थिती आज होऊ नये, यासाठी आता आज महापालिका काय उपाययोजना करणार हाच प्रश्न आहे.
यंदा वेळेवर आलेल्या मान्सूनचा काही काळ खंड पडला. मात्र थोड्याशा खंडानंतर अरबी समुद्रात मान्सूनला पुन्हा अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यात पुढील पाच दिवस कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पुढील 48 तासात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील पाच दिवस कोकण आणि गोव्यात सर्वदूर पाऊस पडेल. आज, शनिवारी अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबईमध्ये पुढील 48 तास अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलाय. पाच तारखेपर्यंत मुंबईत अतिवृष्टीचा इशारा आहे. सहा आणि सात तारखेनंतर पावसाचा प्रमाण कमी होईल. ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 48 तास जोरदार अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलाय. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रात पुढील 48 तासात अनेक ठिकाणी सर्वदूर पाऊस पडेल. पाच तारखेला नंतर अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तर पुढील 48 तासात नाशिक, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा आहे.