देशात पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या काळात उत्तर प्रदेशातील बहुचर्चित मतदारसंघ अमेठीत पुन्हा एकदा हायप्रोफाइल लढत पाहावयास मिळू शकते.
देशात पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा माहोल आता हळूहळू तापू लागला आहे. देशभरातील लक्षवेधी लढतींमध्ये नेहमीच अमेठी मतदारसंघ हा अग्रणी राहिला आहे. कॉंग्रेस नेतृत्वाचा बालेकिल्ला राहिलेल्या या लोकसभा मतदारसंघाला पहिल्यांदाच भाजपाने खिंडार पाडले आणि स्मृती इराणींनी राहुल गांधींना पराभूत करून 2019 मध्ये या मतदारसंघातून विजय मिळवला. आता 2024 मध्ये पुन्हा या दोघांतच लढत रंगणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
दिवाळीनिमित्त अमेठीतील जनतेला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी तसेच कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याकडून भेटवस्तू घरपोच देण्यात आल्या. अर्थात, या भेटवस्तूंमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला वेग आला आहे. राहुल गांधी हे अमेठीत पुन्हा उभे राहतील, असे बोलले जात आहे. अर्थात, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांचा स्मृती इराणी यांच्याकडून पराभव झाला होता. सध्या राहुल गांधी हे केरळच्या वायनाडचे प्रतिनिधित्व करत आहेत.
उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनी काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांच्या आगामी रणनीतीबाबत एक मुद्दा मांडला, तो म्हणजे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी अमेठीतून लढतील, असे सूतोवाच केले. आता राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याकडून दिवाळीनिमित्त घेतला जाणारा पुढाकार पाहता अजय राय यांच्या म्हणण्यात तथ्य असल्याचे दिसून येते. मागील लोकसभा निवडणुकीनंतर अमेठीत राहुल आणि प्रियांका यांची सक्रियता कमी राहिली. 2019 च्या ऐतिहासिक विजयानंतर स्मृती इराणी यांनी अमेठीशी नेहमीच संपर्क ठेवला आहे. त्यांनी अमेठी मतदारसंघातील राजकीय स्थान बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह त्या विकास योजनांचे अनावरण करण्यासाठी अमेठीत दाखल झाल्या होत्या.
दिवाळी सुरू होण्याअगोदर राहुल आणि प्रियांका यांचे छायाचित्र असलेल्या गिफ्ट बॅगांचे वाटप करण्यात आले. या भेटवस्तूंत दिवाळीसाठी कपडे, पूजेचे साहित्य, फराळ आणि अन्य वस्तूंचा समावेश होता. अमेठीतील कॉंग्रेस नेत्याने दिलेल्या माहितीनुसार अमेठी मतदारसंघ क्षेत्रात हजारो बॅगांचे वितरण झाले. या बॅगवर राहुल आणि प्रियांका गांधी यांचे छायाचित्र आहे. या माध्यमातून गांधी कुटुंबीयांनी भावनिक संबंधांना उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप सिंघल म्हणतात, उत्सवाच्या काळात कुटुंबातील सदस्यांना भेटवस्तू पाठवणे ही एक परंपरा आहे आणि राहुल गांधी यांचे अमेठीशी असणारे नाते पाहता त्यांनी दिवाळीला या परंपरेचे पालन केले.
दुसरीकडे, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी देखील दिवाळीनिमित्त अमेठीत भेटवस्तू पाठविल्या. अमेठीतील भाजप नेत्यांच्या मते, या भेटवस्तूंत भिंतीवरचे घड्याळ, साडी, टिफीन, पणत्या, फराळ आदींचा समावेश होता. स्मृती इराणी यांचा फोटो असणाऱ्या बॅगांमधून जनतेला भेटवस्तू दिल्या. भाजप नेत्यांच्या मते, स्मृती इराणी यांच्याकडून सुमारे 300 तरुणांना स्मार्टफोन देण्यात आले. हे सर्व तरुण अमेठी जिल्ह्यात भाजपच्या सोशल मीडिया टीमशी जोडलेले आहेत.
भाजपचे नेते चंद्रमौली यांच्या मते, स्मृती इराणी या दरवर्षी अमेठीतील जनतेला भेटवस्तू देतात आणि ही काही नवीन गोष्ट नाही. त्यामुळे या भेटवस्तू देण्यामागचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. स्मृती इराणींकडून नियमितपणे या भेटवस्तू दिल्या जात असल्याने कॉंग्रेसने देखील अशा प्रकारच्या भेटवस्तू देण्याचा निर्णय घेतला, असा दावा भाजप नेत्याने केला. मात्र कॉंग्रेसचे माजी आमदार दीपक सिंह यांनी भाजप नेत्यांचे म्हणणे नाकारले. त्यांनी म्हटले, की राहुल गांधी यांनी प्रत्येक सणाला अमेठीच्या नागरिकांची आठवण काढली आहे. ते दरवर्षी अमेठीच्या जनतेला भेटवस्तू पाठवत असतात. त्यामुळे भाजपचे आरोप तथ्यहिन आहेत.
अमेठी मतदारसंघावर सर्वांचे लक्ष
कॉंग्रेसचे अजय राय यांनी काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी हे अमेठीतून उभे राहतील, असे संकेत दिले होते. दिवाळीनिमित्त अमेठीतील जनतेला भेटवस्तू दिल्याने त्यांच्या म्हणण्याला बळ मिळाले आहे. त्यामुळे आगामी निवडणूक ही राहुल गांधी विरुद्ध स्मृती इराणी अशी पाहावयास मिळू शकते. मागच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राहुल गांधी हे अमेठीबाबत फारसे सक्रिय राहिले नाहीत आणि त्यांनी आपला मतदारसंघ वायनाड येथे अनेकदा दौरे केले. वास्तविक अमेठी हा गांधी कुटुंबीयांचा बालेकिल्ला मानला जातो. तसेच राहुल गांधी मैदानात न उतरल्यास प्रियांका गांधी लढू शकतात, असेही म्हटले जात आहे. अमेठी मतदारसंघावरून राजकारणात अनेक प्रकारच्या चर्चा होत आहेत.