तुरुवुकेरे (कर्नाटक) – राहुल गांधी ( Rahul Gandhi ) हे “भारत जोडो”यात्रेमुळे भारतीय एकतेचे प्रतीक बनले असून या भारत पदयात्रेनंतर राहुल गांधी यांचे नेतृत्व एका नवीन अवतारात पहायला मिळेल असा विश्वास पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केला आहे. दिग्विजयसिंह हे या यात्रेत सुरूवातीपासून सहभागी झाले असून भारत यात्रींबरोबर ते पायी चालत आहेत.
यात्रेचा आपला आत्तापर्यंतचा अनुभव सांगताना ते म्हणाले की, राहुल गांधी ( Rahul Gandhi ) हे दुर्गम भागातून आणि खेड्यापाड्यातून चालत असल्याने व लोकांचे म्हणणे ते ऐकून घेत असल्याने लोक त्यांच्यामुळे खूप प्रभावित झाले आहेत. या यात्रेमुळे पक्ष बळकट होण्यास मदत होईल,असेही त्यांनी म्हटले आहे.
पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की, या देशात कोणी ‘त्याग’ केला तर तो नेहमीच पूज्य मानला जातो. सोनिया गांधींनी पंतप्रधानपदाचा ‘त्याग’ केला होता. आणि इथे राहुल गांधी ( Rahul Gandhi ) देशभर पायी फिरत आहेत, उन्हात घाम गाळत आहेत, पावसात उभे आहेत, सर्व प्रकारच्या खोट्या बातम्या आणि बदनामी यांच्याशी लढा देत. ते भारत जोडोचे प्रतीक बनले आहेत.
राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांना आपण बऱ्याच काळापासून ओळखतो. त्यांनी एकदा एखादी मोहीम हाती घेतली तर ती साध्य करण्यापासून त्यांना कोणीही रोखू शकत नाही असे ते म्हणाले. खरं सांगायचं तर, मी त्यांना नेहमीच अत्यंत जिज्ञासू, मनाने अत्यंत कटिबद्ध आणि वैचारिकदृष्ट्या वचनबद्ध व्यक्ती म्हणून पाहिले आहे. त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय आध्यात्मिक देखील आहे,असे मतही दिग्विजयसिंह यांनी व्यक्त केले आहे.