Bharat Jodo Nyaya Yatra – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा २५ फेब्रुवारीला उत्तरप्रदेशच्या आग्र्यात दाखल होईल. त्यावेळी सपचे अध्यक्ष अखिलेश यादव त्या यात्रेत सहभागी होणार आहेत.
कॉंग्रेसने याआधीच अखिलेश यांना यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र, आधी जागावाटप, नंतर यात्रेत सहभाग अशी ताठर भूमिका सपने घेतली. त्यामुळे सप आणि कॉंग्रेसमधील हातमिळवणी धोक्यात असल्याचे चित्र निर्माण झाले. पण, दोन्ही पक्षांनी सामंजस्याने मार्ग काढत उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशातील जागावाटप निश्चित केले.
त्या पाठोपाठ उत्तरप्रदेशातील कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय गुरूवारी लखनौमधील सपच्या कार्यालयात दाखल झाले. त्यांनी कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी यात्रेत सहभागी होण्याविषयी अखिलेश यांच्या नावे पाठवलेली निमंत्रण पत्रिका सुपूर्द केली.
अखिलेश यांच्या वतीने सपच्या नेत्यांनी ती स्वीकारली. नंतर अखिलेश यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती सपकडून देण्यात आली. याआधी बिहारमध्ये राजदचे नेते तेजस्वी यादव कॉंग्रेसच्या यात्रेत सहभागी झाले. आता अखिलेश यांच्या सहभागामुळे इंडिया आघाडीचा उत्साह दुणावण्यास हातभार लागेल.