नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेची सांगता १७ मार्चला मुंबईतील सभेने होणार आहे. त्या सभेला उपस्थित राहण्याचे निमंत्रण इंडिया आघाडीतील इतर घटक पक्षांच्या नेत्यांनाही दिले जाणार आहे. त्या माध्यमातून इंडिया शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे सूचित होत आहे.
मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये संबंधित सभा होईल. त्या सभेतून कॉंग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा बिगुल वाजवेल. मात्र, ती सभा केवळ कॉंग्रेसपुरती मर्यादित राहू नये असा विचार पक्षातून पुढे आला आहे. त्यामुळे सभेचे निमंत्रण मित्रपक्षांच्या नेत्यांनाही पाठवले जाणार आहे. त्यासाठी कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे पुढाकार घेणार आहेत.
सभा मुंबईत होणार असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांचा सहभाग निश्चित मानला जात आहे. त्यांच्या व्यतिरिक्त इतर कुठल्या पक्षांचे नेते सभेला उपस्थित राहणार ते पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल. राहुल यांची यात्रा सध्या गुजरातमधून मार्गक्रमण करत आहे. ती १२ मार्चला महाराष्ट्रात प्रवेश करेल.