मुंबई – केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज लाईव्हद्वारे शिवसैनिक आणि जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर टीक करत काही प्रश्नही विचारले. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर आज लाईव्हद्वारे बोलताना उद्धव ठाकरे भावूक झाल्याचे दिसले.
भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेचं पक्ष चिन्ह गोठवल्यानंतर गद्दारांना आनंद होतच असेल पण त्याहीपेक्षा त्यांच्या मागे जी महाशक्ती आहे (भाजप) तिला जास्त आनंद होत असेल की, बघा आम्ही करून दाखवलं. जे आम्हाला जमलं नाही ते आम्ही त्यांचीच माणसं फोडून त्यांच्याच माध्यमातून आम्ही करून दाखवलं. कशी ही माणसं? काय मिळवलंत तुम्ही? ज्या शिवसेनेने मराठी माणसाला आधार दिला, ज्या शिवसेनेने मराठी मनं पेटवली आणि हिंदू अस्मिता जपली शिवसेनेचा तुम्ही हात कापायला निघालात.. शिवसेना हे पवित्र नाव तुम्ही गोठवलंत. काय मिळणार आहे तुम्हाला? आज नाही म्हटलं तरी मराठी माणसाची शिवसेनेने केलेली एक भक्कम एकजूट तुम्ही फोडायला निघालात.
एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना ठाकरे म्हणाले, यांनी कट्यार आपल्या आईच्याच काळजात घुसवलेली आहे. अशी ही उलट्या काळजाची माणसं आहेत, ज्याने हे पवित्र नाव गोठवलं. शिवसेनेचं धनुष्यबाण हे पवित्र निवडणूक चिन्ह गोठवलं. त्यांना (एकनाथ शिंदे) आनंदाने उकळ्या फुटत असतील पण जनता जनार्धन तुम्हाला नक्कीच धडा शिकवेल.
शिवसेना स्थापनेबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, 19 जून 1966 जो शिवसेनेचा स्थापना दिन. तो सगळा काळ मला आजही आठवतो. शिवसेनेच्या स्थापनेचा नारळ ज्यावेळेला फोडला.
ती वेळ सकाळची नऊ साडे नऊची होती. घरचे आम्ही सगळी लोकं होतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून तो नारळ वाढवला गेला आणि त्या नारळातून जे पाणी उडालं त्याचे तुषार माझ्या अंगावरती उडाले. एक क्षणभर जरा अचानक सगळं घडल्यांमुळे अंग शहारलं होतं. पण मला कल्पना नव्हती, कारण मी तेव्हा सहा वर्षाचा होतो. की त्या नारळातून उडालेले पाण्याचे तुषार मला त्या पाण्यानी एवढं चिंब भिजवून टाकतील याची मला कल्पना नव्हती. म्हणता म्हणता मला पक्षप्रमुख पद स्वीकारावं लागलं. मुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं आणि ही पूर्ण जबाबदारी मी एका जिद्दीने पुढे घेऊन जातोय. त्यावेळेला त्या पाण्याने मला भिजवलं होतं. आज शिवसेनेच्या किंवा शिवसेना प्रेमींच्या अश्रूमध्ये मी भिजतोय आणि ते अश्रू केवळ दुःखाचे नाहीयेत उद्वेगाचे आहेत.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर नवीन चिन्हासाठी अर्ज करण्याचे निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटाला सांगण्यात आले. दरम्यान, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल ही तीन चिन्हे सूचवली आहेत.
उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण भाषण लाईव्ह पाहा –