मुंबई – केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज लाईव्हाद्वारे शिवसैनिक आणि जनतेशी संवाद साधला. यावेळी ठाकरे यांनी भावूक होऊन शिवसेना पक्ष स्थापनेच्या आठवणी जाग्या केल्या.
उद्धव ठाकरे म्हणाले, 19 जून 1966 जो शिवसेनेचा स्थापना दिन. तो सगळा काळ मला आजही आठवतो. शिवसेनेच्या स्थापनेचा नारळ ज्यावेळेला फोडला. ती वेळ सकाळची नऊ साडे नऊची होती. घरचे आम्ही सगळी लोकं होतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून तो नारळ वाढवला गेला आणि त्या नारळातून जे पाणी उडालं त्याचे तुषार माझ्या अंगावरती उडाले. एक क्षणभर जरा अचानक सगळं घडल्यांमुळे अंग शहारलं होतं.
पण मला कल्पना नव्हती, कारण मी तेव्हा सहा वर्षाचा होतो. की त्या नारळातून उडालेले पाण्याचे तुषार मला त्या पाण्यानी एवढं चिंब भिजवून टाकतील याची मला कल्पना नव्हती. म्हणता म्हणता मला पक्षप्रमुख पद स्वीकारावं लागलं. मुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं आणि ही पूर्ण जबाबदारी मी एका जिद्दीने पुढे घेऊन जातोय. त्यावेळेला त्या पाण्याने मला भिजवलं होतं. आज शिवसेनेच्या किंवा शिवसेना प्रेमींच्या अश्रूमध्ये मी भिजतोय आणि ते अश्रू केवळ दुःखाचे नाहीयेत उद्वेगाचे आहेत.
दरम्यान, धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर आज लाईव्हद्वारे ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार टीकाही केली. गद्दार गटाने आपल्याच आईच्या काळजात कट्यार खुपसली असल्याचे ठाकरे यांनी म्हंटले. तर पक्ष चिन्ह गोठवल्याचा शिंदे गटापेक्षा त्यांच्यापाठीमागे असलेल्या महाशक्तीला (भाजप) जास्त आनंद होत असल्याचे म्हंटले. त्यांना काय मिळाले असा सवालही ठाकरेंनी भाजपला केला.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर नवीन चिन्हासाठी अर्ज करण्याचे निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटाला सांगण्यात आले. दरम्यान, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल ही तीन चिन्हे सूचवली आहेत.
खालील लिंकवर क्लिक करून पाहा उद्धव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण –