नवी दिल्ली – जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयूच्या विद्यार्थी आघाडीचे माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर कन्हैय्या कुमार यांनी प्रथमच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये बोलताना कुमार यांनी, ‘राहुल गांधी हे एकमेव नेते आहेत, जे भाजपविरोधात इमानदारीने लढा देत आहेत’ असं म्हंटल.
यावेळी बोलताना त्यांचा पूर्वाश्रमीचा पक्ष असलेल्या सीपीआयने त्यांच्यावर गद्दारीचा आरोप केला असल्याबाबत विचारले असता, काँग्रेस पक्ष हा एक मोठं जहाज आहे, हा पक्ष मजबूत राहणं गरजेचं आहे. मी १८ वर्षांमध्ये जे काही शिकलो आहे ते सीपीआयकडूनच शिकलो आहे. माझ्या पक्ष सोडण्याच्या निर्णयामुळे ते दुखावले असतील तर ते साहजिक आहे. मात्र राजकारणामध्ये कोणीच कोणाचा कायमस्वरूपी शत्रू नसतो.
कुमार यांना तुकडे-तुकडे गॅंग व देशद्रोहाच्या आरोपांबाबत विचारले असता त्यांनी जर मी देशद्रोही असेल तर मला अद्याप अटक का करण्यात आली नाही? असा प्रतिप्रश्न विचारत अमित शहा यांनी आपल्याला अटक करावी असं आव्हान दिलं.
दरम्यान, जर भाजप विरोधात काढण्यासाठीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला असेल तर देशात इतरही पक्ष भाजपविरोधात लढत आहेत. त्या पक्षांमध्ये प्रवेश का केला नाही? या प्रश्नावर उत्तर देताना कन्हैय्या कुमार यांनी, काँग्रेस हा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे. पक्षाचे नेते राहुल गांधी राष्ट्रीय पातळीवर भाजपविरोधात लढत आहेत. आम्हाला आरएसएस व भाजपविरोधात लढायचं आहे असं सांगितलं.