अकोले – आपल्याला मिळालेले दैदिप्यमान यश हे जनतेचे आहे. हा जनतेचा विजय आहे. तो मी जनतेच्या चरणी समर्पित करतो. अशा भावना नवनिर्वाचित आमदार डॉ. किरण लहामटे यांनी व्यक्त करून दहशतीमुळे रखडलेल्या अकोलेचा विकास मार्ग आपण यापुढे खुला करू. धनशक्तीवर जनशक्तीने हा विजय मिळवला आहे. हा विजय प्रामाणिक कार्यकर्त्यांचा आहे. जनतेने आपल्याला दिलेला प्रामाणिक कौल असून आपण या विजयाने अधिक भारावलो गेलो आहे. या विजयामुळे आपली जबाबदारी वाढली आहे. असे डॉ. लहामटे यांनी पत्रकारांशी विजयानंतर बोलतांना म्हणाले.
डॉ. लहामटे म्हणाले, यापुढे भ्रष्टाचार निर्मूलन, सुशासन, चांगले राजकारण, आदर्श प्रशासन, सामान्यांना न्याय आणि जनतेचे उतराई होण्यासाठी आपण यापुढे कंबर कसून काम करू व आदिवासींच्या घुसखोरी संदर्भात ज्यांनी यापूर्वी पावले उचललीत त्यांच्या विरुद्धचा लढा यापुढे प्रसंगी विधिमंडळात किंवा न्यायालयात सुरू ठेवू. असा निर्वाळाही त्यांनी दिला. आपल्याला मिळालेली मते ही अपेक्षेपेक्षा जास्त असून आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला आपल्याला जी फरकाची मते मिळाली. तेवढी मतेही समोरचा प्रतिस्पर्धी उमेदवार मिळू शकला नाही, असे पत्रकारांच्या निदर्शनास आणून देऊन ते म्हणाले, माझी कुत्सित भावनेने वल्गना केली गेली. मला बूथ लावायला माणसे भेटणार नाहीत. अशा प्रकारची संभावना करणारे मतपेटीने पराभूत केले आहे आणि दहशतीने मते घेता येत नाहीत. तर मातीशी नाळ जोडणाऱ्याला मातीतील माणसे जवळ करतात. असा भावनिक अंतर्मनाचा आवाज यावेळेस त्यांनी व्यक्त केला.
चाळीस वर्षे प्रस्थापित असणाऱ्यांच्या राजकारणावर काबू असणाऱ्याची सत्ता उलथवून टाकणे व जनतेचा कौल मिळवणे ही सोपी बाब नव्हती. मात्र ते आपण केवळ प्रामाणिक जनतेच्या बळावर, प्रामाणिक सहकाऱ्यांच्या बळावर करू शकलो. पाकीट वाल्यांना आपल्या विजयाचा अंदाज आला नाही, अशी कोपरखळी त्यांनी मारली. आणि सत्ताधारी तंबूत दाखल झालेल्यांना आपण 24 तारखेचा गुलाल उधळणार आहोत. तेव्हा सर्वांनी बरोबर रहावे, यासाठी आवाहन केलेले असताना, ते थांबले नाहीत. आता मात्र हे पुढारी तोंड लपवून बसले आहेत अशी टिप्पणी त्यांनी केली. कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्याला लहान भावासारखे वागवले, प्रेम दिले.
त्यांचे सहकारी सीताराम राऊत, अजय फटांगरे, त्याचबरोबर तालुक्यातील ज्येष्ठ नेते दशरथ सावंत, अशोक भांगरे, डॉ अजित नवले, राष्ट्र सेवा दलाचे विनय सावंत या व अन्य सर्व सहकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली.आपल्या विजयाचा पाया रचला आणि आपल्याला विजयापर्यंत नेऊन पोहोचवले. त्याबद्दल त्यांनी जाहीर कृतज्ञता व्यक्त केली. आणि सामाजिक पटलावर आपले आजोबा व माजी जिल्हा परिषद सदस्य शिवराम बुधा लहामटे, आपले वडील व माजी जिल्हा परिषद सदस्य यमाजी लहामटे यांच्या आशीर्वादामुळे हा विजय आपल्याला मिळाला असेही त्यांनी या वेळेस लक्षात आणून दिले.
शिवसेना आणि भाजपच्या काहींनी छुपी तर काहीनी उघड साथ दिली. शिवाय भाकप माकपच्या पुढाऱ्यांच्या बरोबरच इतर कार्यकर्त्यांनी आपल्याला डोक्यावर घेतले. याकडे त्यांनी लक्ष वेधले. यापुढे आपण प्रशासन गतिमान करणार आहोत. शिवाय शाळा, पाणी, आरोग्य, रस्ते या प्रश्नांचा पाठपुरावा अग्रक्रमात राहील. शिवाय दारूचे अड्डे बंद करणे, अवैध धंदे बंद करणे आणि तरुणांना निर्व्यसनी बनवणे, याबाबतही आपला पुढाकार राहील. या एकूणच वाटचालीमध्ये जे यापुढे भ्रष्टाचारामध्ये पुढाकार घेतील त्यांची आपण काही करणार नाही असा गर्भित इशारा त्यांनी दिला.