पुणे – आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील नवीन जागेचा शोध घेण्यात आला होता. यामध्ये पुरंदरमधील पाच गावे आणि बारामतीमधील तीन गावांचा समावेश होता. आता या नवीन जागेस संरक्षण विभागाने नकार दिला आहे, अशी माहिती मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड ऍग्रीकल्चरचे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
पुरंदर तालुक्यातील सात गावांमधील 2 हजार 832 हेक्टर जागेवर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. केंद्र आणि राज्य सरकार, तसेच एअरपोर्ट ऍथारिटी, संरक्षण मंत्रालयसह सर्व परवानग्या या जागेसाठी मिळाल्या आहे. मात्र, या सातही गावांतील गावकऱ्यांनी आणि स्थानिक आमदार यांनी विमानतळास विरोध दर्शविला होता. त्याची दखल घेऊन राज्य शासनाने पर्यायी जागांचा विचार करावा, अशी सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. दरम्यान, राज्य शासनाच्या प्रतिनिधींनी दिल्लीत जाऊन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. त्यावेळी सिंह यांनीदेखील पर्यायी जागेचा विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.
त्यानुसार निश्चित केलेल्या जागेपासून पूर्वच्या दिशेला दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पर्यायी जागेचे सर्वेक्षण मध्यंतरी एका खासगी संस्थेकडून करून घेण्यात आले. त्यामध्ये पुरंदर तालुक्यातील पाच गावांतील आणि बारामती तालुक्यातील तीन गावांचा समावेश आहे. या आठ गावांतील मिळून सुमारे 3 हजार 68 एकर जागेवर प्रस्तावित विमाळतळ उभारता येऊ शकते, असे संरक्षण मंत्रालयास कळवले. ही सर्व जमीन जिरायत असून संपादन करताना अडचण येणार नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. याबाबतचा प्रस्ताव संरक्षण विभागाला मान्यतेसाठी पाठविला होता. मात्र, त्यास संरक्षण विभागाने विविध कारणे दाखवित ना हरकत प्रमाणपत्र रद्द केले आहे. त्यामुळे दोन्हीपैकी बारामती तालुक्यातील गावांचा समावेश असलेल्या जागेस सरंक्षण विभागाने नकार दिला आहे.