पाथर्डी – नगरपालिका हद्दीतून जाणाऱ्या कल्याण- निर्मल राष्ट्रीय महामार्गालगतची अतिक्रमणे तातडीने काढून घ्यावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के यांनी सुरू केलेले आंदोलन आज तिसऱ्या दिवशी प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर विसर्जित करण्यात आले.
सोनटक्के यांच्यासह या आंदोलनात प्रा.किसन चव्हाण, रवींद्र म्हस्के, रोहिणी ठोंबे, दिलावर बागवान, संजय कांबळे, आकाश दोंडे, नंदकुमार कांबळे, विनायक चौधरी, सुनील जाधव, हनुमान पवार, सुरेश जाधव, सुनीता जाधव, अमोल जाधव आदी सहभागी झाले होते. या आंदोलनाची योग्य पद्धतीने दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत आंदोलकांनी आज रास्ता रोको आंदोलन सुरू केले होते. मात्र त्यानंतर आंदोलकांची मते यांच्यासह तहसीलदार शाम वाडकर, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी भेट घेत चर्चा केली.
सोनटक्के म्हणालकी, महामार्गालगत धनदांडग्यांची जी अतिक्रमणे आहेत ती काढावी, अशी मागणी आपण कित्येक दिवसांपासून करत आहोत. मात्र प्रशासन दुर्लक्ष करत धनदांडग्यांना पाठीशी घालत गोरगरिबांची अतिक्रमणे काढून टाकण्याचे काम करत आहेत. तातडीने ही अतिक्रमणे काढून टाकल्याशिवाय आंदोलन विसर्जित केले जाणार नाही, असा इशारा दिल्यानंतर या विषयावर येत्या 1 डिसेंबर रोजी संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची तहसील कार्यालयात बैठक घेऊन चर्चा केली जाईल, असे आश्वासन मते यांनी दिल्यानंतर आंदोलन विसर्जित करण्यात आले.