सरसकट पाच वर्षे परवानगी मिळाल्याने गणेश मंडळे बिनधास्त
पुणे : गणेश मंडळांना उत्सवांकरिता पाच वर्षांसाठी सरकारने परवानगी जाहीर केली. ही परवानगी मागील वर्षी परवानगी घेतलेल्या मंडळांना लागू झाली आहे. यामुळे यंदा परवानगीसाठी मंडळांना खेटे मारायची गरज पडली नाही. ही बाब लक्षात घेऊन मंडळांनी सरसकट नियम धाब्यावर बसवून भले मोठे मांडव घालत रस्ते अडवले आहे. काही मंडळांनी तर रस्त्याची एक अख्खी लेनच व्यापली आहे. यामुळे अशा ठिकाणी सायंकाळच्या वेळी प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. उत्सव सुरू झाल्यावर तर वाहतूक कोंडीचा उद्रेक होईल, असे चित्र दिसत आहे.
मंडळांना दरवर्षी परवानगी घ्यावी लागत होती. यासाठी महापालिका आणि पोलीस यंत्रणा एक खिडकीद्वारे परवानगी देत होते. परवानगी घेताना वाहतूक शाखा आवर्जुन मंडळाच्या मांडवाची साईज पाहत होते. तसेच प्रत्यक्षात जागेवर जाऊन वाहतूक कोंडी होऊ शकते का, हेही पाहिले जात होते. मात्र, यंदा मंडळांना पाच वर्षांची परवानगी मिळाल्याने वाहतूक शाखेकडे कोणी फिरकलेच नाही. यातच सरकारने मंडळांच्या बाजूने भूमिका घेतल्याने पोलीस आणि महापालिका प्रशासनाला हातावर हात ठेवण्यापलीकडे कोणतेच काम उरले नाही.
आगामी निवडणुका लक्षात घेता बड्या मंडळांना राजकीय पक्षांचा आर्थिक व इतर पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळत आहे. यामुळे काही मंडळे सर्रास नियम धाब्यावर बसवत आहेत. प्रशासकीय अधिकारीही राजकीय नेत्यांपुढे हतबल झाले आहेत. याचा त्रास मात्र सर्वसामान्य नागरिकांना होताना दिसत आहे. सध्या मंडपांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी मंडळे सर्रास रस्त्यावर साहित्य उतरवत आहेत. तसेच स्वत: बॅरिकेडस लावून रस्ते अडवत आहेत. काही मंडळे या कामासाठी क्रेन वापरत आहेत. या क्रेनमुळे आणखीन वाहतूक कोंडीत भर पडत आहेत.
सरसकट पाच वर्षांच्या परवानगीने नियम धाब्यावर
पूर्वपरवानगी मिळाल्याने वाहतूक शाखेकडे मंडळांची पाठ
बॅरिकेड्स लावून रस्ते अडवण्याचे प्रकार
मंडप साहित्यामुळे वाहतूक कोंडीत भर