पुणे – महापालिका निवडणुका लांबणीवर पडल्यावर असल्या तरी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील राजकीय वादाची धग होळीच्या दिवशीही शहरात पुन्हा एकदा पहायला मिळाली. महापालिकेतील सत्ताधारी भाजप सत्तेचा दुरूपयोग करीत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीने आसुरी शक्तींची होळी केली. तर भाजपने राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अपयशाची होळी साजरी केली. त्यामुळे, पालिका निवडणूकांच्या तोंडावर शहरात ऐण सनासुदीत आरोप प्रत्यारोपांची होळी पहायला मिळाली.
महाविकास आघाडीच्या कारभाराची होळी
भारतीय जनता पक्षाच्यावतीने महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराची होळी करण्यात आली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष जगदिश मुळीक यांच्यासह माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आणि पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हे सरकार, शेतकरी, एस.टी.कामगार, सर्वसामान्यांच्या विरोधातील भ्रष्टाचारी सरकार असल्याचे सांगत, महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराची होळी करण्यात आली. या वेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करीत प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या हस्ते होळी पेटविण्यात आली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सर्व पातळ्यांवर अपयश आले असून या सर्व वाईट कारभाराची होळी करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांत भाजपकडून शहरात घेण्यात आलेले विविध कार्यक्रम त्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेसला देण्यात आलेला सूचक इशारा यामुळे भाजप पक्षांतील पदाधिकारी शाब्दिक चकमकीत वरचढ वाटू लागले होते. आज होळीच्या निमित्तानेही भाजपने राष्ट्रवादीला टार्गेट करण्याची संधी सोडली नाही.
राष्ट्रवादीने केली आसूरी शक्तीची होळी
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयाच्या प्रांगणात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे वाढलेली महागाई, भ्रष्टाचार, जातिवाद तसेच पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचा ई-व्हेईकल घोटाळा, नदी सुधार घोटाळा, लाखांचे झाड, ऍमिनिटी स्पेस विक्री घोटाळा, फ्लॅट विक्री घोटाळा, जलपर्णी घोटाळा, कॉफिटेबल बुक घोटाळा या विविध घोटाळ्यांच्या अनिष्ट व नकारात्मक गोष्टींचे दहन करीत प्रतिकात्मक होळी साजरी केली. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या माध्यमातून केंद्रातील सत्ताधारी भाजप असो व महानगरपालिकेत गेल्या पाच वर्षात कारभारी करणारी भाजप असो, दोन्ही ठिकाणी सत्ताधारी भाजपमुळे नागरिकांना विविध त्रासांना सामोरे जावे लागले असल्याचे सांगत हे मुद्दे गंभीर बनले असून जर विरोधी पक्षातील कोणी या मुद्द्यांवर आवाज उठवला तर त्यांना केंद्रीय तपास यंत्रणांचा धाक दाखवत छापेमारी, धाडसत्र, अटक यांसारखी दडपशाही करत असल्याचा आरोप यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला.