पुणे – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार चांगले काम करत आहे. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर आघाडीबाबत उत्साहाच्या भरात कोणीही, कोणतीही वक्तव्ये करू नका, जे काही बोलायच आहे ते पक्षाचे प्रवक्ते बोलतील असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना भरला.
सरळ आमचे पक्षातील ज्येष्ठ नेते आणि वरिष्ठ नेते याबाबत बोलतील असे सांगून टाका असे बजावले. पुण्यात पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. महाविकास आघाडीतील नेत्यांकडून स्वबळाची भाषा केली जात असल्याने राज्यात अनेक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक पातळ्यांवर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. त्यामुळे, महाविकास आघाडीत कुरबुरी वाढल्या असल्याने पवार यांनी या कानपिचक्या दिल्याची चर्चा आहे.
पवार म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारचे काम चांगले आहे. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढविण्याची मोकळीक आहे. त्यामुळे आघाडी बाबत वक्तव्ये करून आघाडीतील संबध बिघडवू नका, आघाडी बाबत जे काही काही बोलायचे आहे ते पक्षाचे प्रवक्ते बोलतील. त्यांनीही तुम्हाला वारंवार प्रश्न विचारले जात असली तर आमचे पक्षाचे नेते बोलतील, राज्यातील पदाधिकारी बोलतील त्यानंतर आमचे प्रवक्ते बोलतील असे स्पष्ट सांगावे, मात्र, कोणतीही व्यक्तव्ये करू नयेत.
राष्ट्रवादी भाकरी फिरविणार नव्यांना देणार संधी…
या वेळी बोलताना त्यांनी पक्षातील अंतर्गत कुरघोड्या करणाऱ्यांनाही आपल्या खास शैलीत दम भरला, पुण्यात राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत. खडकवासला मतदार संघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला केवळ 1600 मतांनी पराभव पत्कारावा लागला. हे केवळ पक्षातील एकदोन नाराजांमुळे झाले.
मात्र, भविष्यात असे होता कामा नये असे ते म्हणाले. या पुढे पक्षात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. ज्यांना संधी देता आली नाही त्यांचा विचार केला जाईल. त्यामुळे कोणीही या पुढे या कार्यालयात गटातटाचे राजकारण करू नये तसेच इथं वाद घालू नयेत, याचा विचार करूनच या कार्यालयाची पायरी चढावी अशा शब्दात अंतर्गत गटबाजी करणाऱ्यांना पवार यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने इशारा दिला आहे.