“जर वाईट सवयी वेळेत बदलल्या नाहीत, तर त्या सवयी आपला वेळ बदलतात.’ तसे पाहता आजपर्यंत सवयींवर अनेक सुवचने ऐकली. सवयी या आपल्या जीवनावर फार मोठा परिणाम करीत असतात. सवयी दोन प्रकारांत आपण विभाजित करतो. चांगल्या सवयी किंवा वाईट सवयी.
अगदी शालेय जीवनापासून सवयींबाबत मनावर कोरले जाते. परंतु बदलत्या काळाप्रमाणे या सवयींचे अर्थ आणि व्याख्या आपण सोयीप्रमाणे बदलतो आणि तिथूनच खऱ्या अर्थाने सवयी आपल्या जीवनावर प्रभाव पडण्यास सुरुवात करतात. मग तो प्रभाव सकारात्मक असो किंवा नकारात्मक.सवय म्हणजेच स+वय.
“स’ म्हणजे सोबत आणि “व’ म्हणजे वय, जी वयासोबत अंगी भिनते ती सवय. जसजसे वय वाढते तसतसा सवयीचा विळखा अधिक घट्ट होत जातो. आपल्या ध्येयाकडे, यशाकडे नेणाऱ्या चांगल्या सवयी अंगी बाणवायच्या असतील तर आपल्याला सवयींचा “21/90′ चा जगप्रसिद्ध फॉर्म्युला समजून घ्यावाच लागेल.
21/90 चा फॉर्म्युला –
आपल्या प्रत्येकाची इच्छा असते की, आपण निरोगी राहावे, आपले करियर चांगले व्हावे, आपल्याला यश मिळावे. परंतु त्यासाठी त्या अनुषंगाने आवश्यक असणाऱ्या सवयी आपल्याला लावून घ्याव्या लागतात. कोणतीही सवय ही तात्काळ लागत नाही. तर त्यादृष्टीने प्रयत्न करावे लागतात आणि या सवयी लागण्यासाठीच “21/90′ चा फॉर्म्युला मोलाचा ठरतो.
आपली मानसिकता आणि आपल्याला लागलेल्या सवयी अनेकदा नावीन्याचा स्वीकार करण्यापासून रोखतात. अशावेळी आपण चांगल्या सवयींसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे असते. “21/90′ च्या नियमानुसार कोणतीही सवय सोडण्यासाठी किंवा सवय लावण्यासाठी किमान 21 दिवस लागतात आणि त्याच सवयीला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्यासाठी किमान 90 दिवस द्यावे लागतात.
1960 साली प्रसिद्ध अमेरिकन प्लॅस्टिक सर्जन मॅक्सवेल माल्ट्झ यांनी “सायको सायबरनेटिक्स’ या पुस्तकातून 21 दिवसांच्या सवयीबद्दल लिहिले. यात या नियमाबाबत लिहिताना, “दहा वर्षांपूर्वी सर्जरीचे काम करत असताना मॅक्सवेल यांना आपल्या रुग्णांमध्ये एक अजब गोष्ट आढळली. ती म्हणजे प्लॅस्टिक सर्जरीनंतर एखाद्या रुग्णाला स्वतःच्या चेहऱ्याची जाणीव होण्यासाठी किमान 21 दिवस लागत होते.
कोणाचा हात किंवा पाय सर्जरीमध्ये कापला असता आपल्याला तो अवयव नाही याची जाणीव व्हायलाही जवळपास 21 दिवस लागतात. त्यांनी त्यांच्या या निरीक्षणांवरून असा निष्कर्ष काढला की, सहसा मनातली जुनी गोष्ट पूर्णपणे नवीन गोष्टीत बदलण्यासाठी कमीतकमी 21 दिवस लागतात. यात व्यक्तिपरत्वे आणि कालपरत्वे बदल दिसू शकतात. पुढे याच “21/90′ च्या फॉर्म्युल्यावर काम करून फिलिपा लिली यांनी हाच कालावधी किमान दोन महिने कसा लागतो, हे सिद्ध केले.
एक गोष्ट मात्र यातून नक्कीच अधोरेखित होते आणि ती म्हणजे सवय लागेपर्यंत जाणीवपूर्वक प्रयत्न करीत राहणे. जसे आपण आजारी पडल्यावर त्यातून बाहेर येईपर्यंत औषधांचा डोस घेतो. अगदी त्याचप्रमाणे त्या सवयीचे आवडीत रूपांतर होईपर्यंत आपण वारंवार ती गोष्ट केली पाहिजे.
व्यायाम, वाचन, सादरीकरण, छंद जोपासना, कल्पकता, चिकाटी, हजरजबाबीपणा, कष्ट इत्यादी अनेक सकारात्मक सवयी आपल्याला लावाव्या लागतील आणि या लावताना त्यासाठी किती दिवस लागतील हे मोजण्यापेक्षा एका दिवसात आपण किती प्रयत्नशील आहोत याला महत्त्व द्यावे. हळूहळू आपण बदलाचा भाग होतोय आणि चांगल्या सवयी आपल्या मनात परावर्तित होत आहेत याची जाणीव आपल्याला होईल. लक्षात ठेवा, बदलली सवय तरच बदलेल “समय.’
– सागर ननावरे