Pune News : कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणाचा तपास कोथरुड पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. या गुन्हयातील आरोपींना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने पकडले होते. दरम्यान मोहोळ खून प्रकरणानंतर गुन्हे शाखा शहरातील टोळ्यांची झाडाझडती घेणार आहे. टोळी प्रमुखांना वचक बसेल अशी कारवाई केली जाणार आहे. जेणेकरुन भविष्यात कोणतीही टोळी डोकेवर कारढणार नाही. सध्या शहरातील नऊ नामचिन टोळ्या आणि १६ रायझिंग टोळ्यांकडे गुन्हे शाखेने लक्ष केंद्रीत केले आहे.
कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा खून करण्यासाठी मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याने मोहोळचा विश्वास प्राप्त करुन त्याच्या टोळीत शिरकाव केला होता. मागील महिणाभर तो सातत्याने मोहोळबरोबर त्याचा पंटर म्हणून वावरत होता. दोघे जेवणही एकत्रच करायचे. मात्र संधी मिळाताच मुन्नाने शरद मोहोळचा गेम केला. मोहोळचा खून करुन मुन्नाने आपल्या मामाच्या अपमानाचा बदला घेतला.
शरद मोहोळ आणि आरोपी मुन्नाचा मामा नामदेव कानगुडे यांचे दहा वर्षापासूनचे वैमनस्य आहे. कानगुडे मोहोळसाठी कार्यरत होता, तसेच सुतारदरा परिसरातच रहायचा. मात्र मोहोळच्या पंटर लोकांनी नामदेव कानगुडेला मोहोळच्या सांगण्यावरुन दहा वर्षापुर्वी मारहाण केली होती. तसेच हिंजवडी येथील एका जागेच्या व्यवहारातील कमिशनवरुन त्यांच्यातील वादही पेटला होता.
मोहाळने केलेल्या गुन्हयामध्ये कानगुडेच्या काही जवळच्या व्यक्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत. त्यांच्या जामिनासाठी कानगुडेने मोहोळकडे मदत मागितली होती. मात्र मोहोळने त्याला दाद दिली नाही. यामुळे कारागृहातील साथीदारांसाठी कानगुडेने हा बदला घेतला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान मोहोळ मुळे कानगुडेला सुतारदरा परिसर कुटूंबासह सोडून मुळशीला स्थायिक व्हावे लागले होते. तो सध्या एका बारमध्ये वेटरचे काम करत होता. मात्र त्याच्या मनात मोहोळ विरोधात खदखद कायम होती. यामुळे त्याने भाच्याच्या मदतीने मोहोळचा गेम केला.
शहरात मागील २० ते २५ वर्षापासून नऊ मोठ्या टोळ्या कार्यरत आहेत. त्यांच्यातील वैमनस्यातून अनेकांवर गुन्हे दाखल होऊन टोळी प्रमुखांसह टोळीतील सदस्य कारागृहात सजा भोगत आहेत.
यातील काहींना मोक्का ही लागला आहे. तर एक दोन टोळीप्रमुख जामिनावर सुटले आहेत. मात्र मधल्या काळात त्यांनी सक्रीय गुन्हेगारीकडून जमिनीचे व्यवहार आणि राजकारणाकडे लक्ष दिले आहे. यामुळे शहरात मागील दहा वर्षात तरी टोळीयुध्द झाले नाही. अनेक टोळीप्रमुखांनी वरवर एकमेकांशी जुळवून घेतले आहे. तर दुसरीकडे नव्याने काही टोळ्यांचा उदय झाला आहे. त्यांची संख्या १३ ते १६ च्या आसपास आहे.
यामध्ये अल्पवयीन मुलांचा मोठा भरणा आहे. मात्र मोक्काच्या कारवायांमुळे मोठे गुन्हे करणारे अनेक गजाआड आहेत. मात्र त्यांचे अल्पवयीन साथीदार सक्रीय आहेत. शरद मोहोळ खून प्रकरणानंतर खडबडून जागे झालेल्या गुन्हे शाखेने आता या टोळ्यांकडे लक्ष केंद्रीत केले आहे. या सर्वांची पध्दतशीरपणे हजेरी घेतली जाणार आहे. आता गुन्हे शाखेत पुन्हा एकदा टोळीप्रमुख गुडघ्यांवर बसलेले चित्र पहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.