जम्मू – प्रजासत्ताक दिन आणि दाट धुक्याच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर सतर्कता वाढवण्यात आली आहे. तसेच सीमावर्ती भागातील एक किलोमीटर परिघात रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत लोकांच्या हालचालींवर बंदी घालण्यात आली आहे.
बीएसएफच्या जवानांना पाकिस्तानकडे वाहणाऱ्या नद्या आणि नाल्यांवर कडक नजर ठेवण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर सीमा पोलिस चौक्यांवर तैनात असलेल्या जवानांनाही रात्रंदिवस सतर्क राहून संशयितांवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
बीएसएफने सीमावर्ती भागातील लोकांच्या हालचालींबद्दलच्या चिंतेबद्दल जिल्हा प्रशासनाला देखील कळवले होते, ज्यावर जिल्हा उपायुक्त अभिषेक शर्मा यांनी कलम १४४ सीआरपीसी अंतर्गत सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेपासून 1 किलोमीटरच्या पट्ट्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे.
तरिही जर हालचाल आवश्यक असेल तर त्या व्यक्तीला त्याचे संबंधित ओळखपत्र बीएसएफ, पोलिस अधिकार्यांना सादर करावे लागतील. वरील आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. हा आदेश तात्काळ लागू होईल आणि तो जारी झाल्याच्या तारखेपासून साठ दिवसांच्या कालावधीसाठी लागू राहील.