पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने राज्यात पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. या अंतर्गत उभारण्यात येणारे पूल, इमारतींसारख्या सुविधा १०० वर्षे टिकाव्यात यासाठी त्यांची उभारणी गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, अत्याधुनिक पद्धतीने करावी, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात, ‘उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षा’ची बैठक झाली. त्यावेळी पवार यांनी हे आदेश दिले आहेत. या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार यांनी मेट्रो मार्ग १, २ आणि ३, लोणावळा येथील स्कायवॉक व टायगर पॉइंट, पुणे बाह्यवळण रस्ता, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे, ‘सारथी’संस्थेचे पुण्यातील मुख्यालय, औंध, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावतीतील ‘सारथी’च्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकाम, पुणे येथील कृषीभवन, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, नोंदणीभवन, इंद्रायणी मेडिसिटी, पिंपरी-चिंचवड येथील सायन्स इनोव्हेशन सिटी, वढू-तुळापूर येथील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक, ऑलिम्पिक भवन, बारामती येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला.