पुणे : खून प्रकरणात सहा वर्षे उलटली तरीही अद्याप आरोप निश्चित करण्यात आलेले नाहीत. ही बाब बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने सत्र न्यायाधीश व्ही.आर.कचरे यांनी एकाला जामीन मंजुर केला. योगेश दीपक चकोले असे त्याचे नाव आहे. त्याने ॲड. अकाश घोरपडे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.
फुलचंद दिंगबर गंडले असे खून झालेल्याचे नाव आहे. त्याच्या पत्नीने याबाबत मुंढवा पोलिसात फिर्याद दिली आहे. २३ जून २०१८ रोजी ही घटना घडली. फुलचंद आणि शेजारी राहणारे कुणाल आणि त्याचे वडील पांडुरंग गंडले यांच्यात पूर्वी पाण्याच्या कारणावरून वाद झाला होता. त्याविरोधात फुलचंद यांनी पोलिसात तक्रार दिली होती.
त्यानुसार भादवी कलम ३२४ (मारहाण) नुसार दोघांना अटक झाली होती. याचा राग मनात धरून कुणाल आणि त्याचा मित्र चकोले यांनी लाकडाने पाठीवर व छातीवर मारहाण केली होती. यामध्ये फुलचंद यांचा मृत्यू झाला आहे.
या प्रकरणात २०१८ पासून आरोप निश्चिती झालेली नाही. सहाअरोपीला जामीन झाला आहे. त्यामुळे त्यालाही जामीन देण्याची मागणी ॲड. आकाश घोरपडे यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला.