पुणे – राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे आज माझी जेवढी काळजी करतात त्याच्या १० टक्के तरी काळजी पवारसाहेबांनी योग्य वेळी केली असती तर आज चित्र वेगळे असते, अशी टिपण्णी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केली. म्हात्रेपूलानजिक असलेल्या डीपी रस्त्यावर भाजपच्या नवीन कार्यालयाला फडणवीस यांनी रविवारी भेट दिली. यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे, पदाधिकारी उपस्थित होते.
अयोध्येऐवजी नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन उद्धव ठाकरे पूजा करणार आहेत, याविषयी विचारले असता, उद्धव ठाकरे कोणत्यातरी मंदिरात जात आहेत हे ही नसे थोडके, अशी मार्मिक टिपण्णी फडणवीस यांनी केली. तसेच आरक्षणाचा विषय योग्य वेळी होईल, असेही फडणवीस यांनी नमूद केले.
राज्यातील बर्याच कार्यक्रमांमध्ये, बैठकांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारच दिसतात, बातम्यांमध्ये झळकतात, फडणवीस आजकाल कुठेच टीव्हीवर वगैरे दिसत नाहीत, अशी टीका खा. सुप्रिया सुळे यांनी केली होती. त्यावर विचारले असता उपरोक्त प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. भाजप पदाधिकार्यांबरोबर नवाब मलिक यांचे फ्लेक्स अनेकठिकाणी लागले आहेत, त्याविषयी विचारले असता, याबाबत माझी आधी जी भूमिका होती तीच कायम आहे आणि भाजपची देखील तीच भूमिका आहे, असे ठामपणे उत्तर फडणवीस यांनी दिले.
गुंडांना पाठीशी घालण्याबाबत सरकारवर होणार्या टीकेला उत्तर देताना फडणवीस यांनी, विरोधी पक्षांच्या सरकारच्या काळात शंभर कोटी रुपयांचे आरोप होत नव्हते, अंबानी यांच्या घराखाली बॉंब ठेवले जात नव्हते, साक्षीदारांचे खून होत नव्हते तसेच सचिन वाझे हा लादेन नव्हता का, असा उपहासात्मक सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.
आमदार सुनील कांबळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी खा. सुळे यांनी केली आहे, त्या बोलतील म्हणून कारवाई करायची, असे नाही, पोलिसांकडून योग्य ती कारवाई केली आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले.
राम मंदिर हा भाजपचा कार्यक्रम नाही
राम मंदिर हा भाजपचा कार्यक्रम नाही, त्यामुळे राम मंदिराच्या निमित्ताने भाजप घरोघरी संपर्क करत लोकसभा सर करण्याचे लक्ष्य साध्य करत आहे, हे म्हणणे चुकीचे आहे. हा रामभक्तांचा उत्सव, कार्यक्रम आहे. हा कारसेवकांचा कार्यक्रम आहे. ते रामभक्त अक्षता देत आहेत, त्यामुळे याबद्दल कोणाला दु:ख होण्याचे कारण नाही, असे फडणवीस म्हणाले.
शरद मोहोळच्या पत्नीने घेतली फडणवीसांची भेट
कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा शुक्रवारी दुपारी गोळ्या झाडून खून करण्यात आल्याने कायदा-सुव्यवस्थेवरून विरोधक सरकारवर टीकेची झोड उठवित आहेत. त्या पार्श्वभूमीवर शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी उपमुख्मंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. हल्लेखोरांवर तातडीने कारवाई करून न्याय द्यावा, अशी मागणी स्वाती मोहोळ यांनी फडणवीसांकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली. स्वाती मोहोळ या भाजप पुणे शहर महिला आघआडीच्या सरचिटणीस आहेत. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी एप्रिल २०२३ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.