वाई : वाई शहरातील गुंडगिरी मोडून काढावी लागणार आहे. वाईकरांनी न्याय हक्कांसाठी काढलेला मोर्चा योग्यच आहे. मोर्चातील प्रमुख कार्यकर्त्यांवर पोलीस प्रशासनाने केसेस दाखल करून गुंडगिरीला प्रोत्साहन दिले आहे.
पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांवर जिल्हा पोलीस अधीक्षकांना कारवाई करण्यास भाग पाडू. मोर्चातील कार्यकर्त्यांवर अन्याय होवू देणार नाही, अशी ग्वाही खा. उदयनराजे भोसले यांनी दिली.
खा. उदयनराजे हे वाईत एकाकार्यक्रमासाठी आले असता मोर्चातील कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेवून गाऱ्हाणे मांडले. यावेळी काशिनाथ शेलार, दीपक ननावरे, अजय मांढरे, विजय ढेकाणे, सचिन घाटगे, प्रवीण जाधव, प्रसाद देशमुख यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
यावेळी उदयनराजे म्हणाले, शहरात वाढलेल्या गुंडगिरीविरोधात वाईकरांनी मोर्चा काढला होता. या प्रकरणात पोलिसांनी मोर्चा काढणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. याविषयी संताप व्यक्त केला जात आहे. हा प्रकार कार्यकर्त्यांनी उदयनराजेंना सांगितला.