पुणे – दत्तनगर ते पीआयसीटी मुख्य रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचं काम मागील दोन ते तीन आठवड्यापासून चालू आहे. कामाच्या वेग अतिशय संथ असल्याने पर्यायी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी सोडवण्यााठी महापालिका तसेच वाहतूक पोलीस कोणतेच प्रयत्न करत नाहीत.
यामुळे सकाळ -संध्याकाळ वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांनी थेट पोलीस नियंत्रण कक्षाकडे एक नव्हे तर तीन वेळा दाद मागितली. मात्र त्याला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
महापालिका प्रशासनाकडून धनकवडी, कात्रज दुध डेअरी, भारती विद्यापीठ परिसरात एकाच वेळी पाईप लाईन आणि सिमेंटच्या रस्त्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामुळे नागरिकांना घराकडे जाण्यासाठी गल्ली बोळांचा आसरा घ्यावा लागत आहे. अरुंद गल्ली बोळामध्ये दोन्ही बाजुने चारचाकी , दुचाकी वाहने समोरा समोर आल्यास तासनतास वाहतूक कोंडी होत आहे.
ही कोंडी सोडविण्यासाठी ना महापालिकेने वॉर्डन ठेवले आहेत ना वाहतूक पोलिसांनी कर्मचारी नेमले आहेत. यामुळे ऐन कार्यालयीन वेळेत निघणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच रहिवाशांना दैनंदिन कामासाठीही बाहेर पडता येत नाही. या कामाच्या ठिकाणी संबंधित कॉन्ट्रॅक्टरने जो फलक लावणे अपेक्षित आहे की ज्यावर कामाचे स्वरूप व त्याचे टेंडर नंबर त्याची पूर्ण वेळ होण्याचा कालावधी यांच्याबद्दल सर्व माहिती देणं हे अपेक्षित आहे.
ते या कॉन्ट्रॅक्टरने दिलेलं नसल्याचे नागरिकांनी सांगितले. रस्ता बंदचे फलक मागील काही दिवसांत लावले गेले,मात्र पर्यायी रस्ता दाखवला गेला नाही.यामुळे वाहन चालक मिळेल त्या गल्ली बोळातून सोसायट्यांतून वाहने हाकत रस्ता शोधत आहेत. या कामाची काही सजग नागरिकांनी चौकशी केली असता सदर कामाला सहा महिन्यात पर्यंतचा कालावधी लागू शकतो असं लक्षात आले.
तर कामाचा दर्जा बद्दल नागरिक सांगतात की केलेल्या कामावर पाणी मारणे आवश्यक आहे ते पण मारले जात नाही. यामुळे कामाचा दर्जा जर चांगला नसेल तर वरचा स्तर उखडून वाळू कच वर येऊन भविष्यात समस्या वाढू शकतात. तसेच तिरंगा चौक ते राजमाता भुयारी मार्गाकडे जाताना जो भाग आहे तेथे तांत्रिकदृष्ट्या बऱ्याच अडचणी आहेत . ड्रेनेजच्या व रेन वॉटर संदर्भातही समस्या आहेत.
तेथे तर डांबरी रस्ता न खोदता त्यावर सिमेंटचे थर टाकून रस्ता तयार केला जात आहे. यामुळे रस्त्याची उंची अर्धा फुट वाढली आहे. रस्त्याच्या कडेची सर्व दुकाने फुटभर रस्त्याच्या खालच्या पातळीवर गेल्याने पावसात तेथे मोठ्या प्रमाणात पाणी घुसून व्यवसायीकांचे नुकसान होणार आहे.
यासंदर्भात महापालिका आयुक्तांनाही परिसरातील सर्व नागरिकांचे वतिने मधुकर वाळुंजकर,शंतनु पेंढारकर,अनिल पोवार ,किसनराव ओव्हाळ ,एन टी वाघ, अशोक भुजबळ, विश्वास सुर्यवंशी , दिगंबर यादव, मिलिंद फाटक , धवल थिटे , हृषिकेश ओव्हाळ, केतन मोहिते यांनी निवेदन दिले आहे.
“आम्ही पोलीस नियंत्रण कक्षाला दोन ते तीन वेळा कॉल करुन समस्येची माहिती दिली. मात्र कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यांकडून फक्त फिडबॅकसाठीच कॉल आले.” – मधुकर वाळुंजकर (रहिवाशी)