लोणी काळभोर -सध्या सर्वत्र लग्न सराईची धामधूम परत एकदा जोरदार सुरू झाली आहे. वधू- वरांच्या गळ्यात पुष्पहार कधी पडेल याची आतुरता सर्वांना असते; मात्र अलीकडच्या काळात करवले (वधू-वराचे खास मित्र) वधू-वर एकमेकांना गळ्यात पुष्पहार घालताना जाणीवपूर्वक व्यत्यय आणून त्यांना उचलून घेण्याचा एक नवा धोकादायक स्टंट करून त्यांच्या जीवाशी खेळताना पहायला मिळतात.
पूर्वीपासून विवाह सोहळ्यात करवली व करवले यांचे महत्वाचे स्थान आहे. यामध्ये मित्र, मैत्रिणी, पाहुणे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वधू-वराला विवाह संपन्न होईपर्यंत त्यांच्यासोबत राहून मदत करण्याची भूमिका त्यांनी निभावणे गरजेचे आहे; मात्र सध्या या करवले मंडळींनी वधू-वराला उचलून घेऊन एक भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे.
दिवसेंदिवस करवले मंडळींनी विनाकारण मंडप, मंगल कार्यालयाचे व्यासपीठावर करीत असलेली गर्दी डोकेदुखी ठरत आहे. वधू-वरांना उचलण्यामुळे नक्की कोणाची किती प्रतिष्ठा वाढतेय? का न उचलण्यामुळे कमी होतेय? हे न सुटणारे कोडे आहे. अशा उचलण्यामुळे काही ठिकाणी किरकोळ अपघात घडत आहेत; मात्र उचलणारे याची जबाबदारी घेणार का? असा प्रश्न निर्माण झाला.
मंगलाष्टके संपल्यावर वधू-वर एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घालण्यासाठी आतुरलेले असतात; मात्र हे पुष्पहार घालायच्या वेळेस एकमेकांना उचलून नक्की काय साध्य करतात. नेमकं यावेळी वधू वरांना उचलण्याचा हेतू कोणता हे स्पष्ट होत नाही. यामध्ये करवले मंडळी हेच जास्त पुढे असल्याने कोणता हेतु यामागे लपलेला आहे.
यासाठी याचे संशोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे. विवाह सोहळा विना तंटा संपन्न व्हावा, अशी प्रत्येक वरपित्याची अपेक्षा असते. यामुळे या करवले मंडळींना कोणी बोलण्याचे धाडस करत नाही. याचाच गैरफायदा हे करवले घेत आहेत. यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मारा सहन करावा लागत आहे. असे प्रकार रोखण्यासाठी विवाह सुरू होण्यापूर्वी सर्वांना पूर्वसूचना देणे गरजेचे आहे.
तसेच व्यासपीठावर फक्त वधू आणि वर, दोघांचे मामा व पुरोहित यांच्या व्यतिरिक्त कोणीही थांबू न देण्याची विनंती करण्यात यावी, तेव्हाच असे प्रकार बंद होण्यास थोडी मदत होईल. आपल्या संस्कृतीत विवाह हा पवित्र संस्कार समजला जातो. त्यामुळे या पवित्र संस्कार प्रसंगी करवल्यांनी आघावपणा न करता या संस्काराचे पावित्र्य जपावे, अशी मागणी जेष्ठ मंडळी व्यक्त करीत आहेत.