पुणे – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्राचीन भारतापासून ते अगदी आजपर्यंतच्या भारताचा वैभवशाली इतिहास “स्वातंत्र्याची अमृतगाथा’ या महानाट्यातून पुण्यात तब्बल 1100 विद्यार्थ्यांनी एकाच रंगमंचावर सादर केला. हा भव्य सोहळा नुकताच पार पडला.
शि.प्र.मंडळी संस्थेच्या एस.पी.एम.इंग्लिश स्कूलतर्फे “स्वातंत्र्याची अमृतगाथा’ या महानाट्याचे आयोजन स.प.महाविद्यालयाच्या हॉकी मैदानावर करण्यात आले होते. यावेळी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, ज्येष्ठ लेखिका वीणा देव, अभिनेता विराजस कुलकर्णी, रा.स्व.संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे, शि.प्र.मंडळीचे उपाध्यक्ष गजेंद्र पवार, नियामक मंडळाचे अध्यक्ष ऍड. एस.के. जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, शाळा समितीचे अध्यक्ष ऍड. मिहीर प्रभुदेसाई, राजेंद्र पटवर्धन, सुधीर काळकर, सतिश पवार, नियामक मंडळ सदस्य पराग ठाकूर, सुनील जोशी, राजेश पटवर्धन, शाळेच्या मुख्याध्यापिका रमा कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.
सलग 2 तास 15 मिनिटांचे हे महानाट्य आहे. प्राचीन भारतातील चाणक्य-चंद्रगुप्त मौर्य त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड, 1857 चे स्वातंत्र्यसमर, वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांचे कार्य नाटकातून उलगडण्यात आले.
विशेषतः स्वातंत्र्यानंतर महिला सबलीकरण, हरितक्रांती, उद्योगधंद्यांचा विकास, अण्वस्त्र चाचणी, इस्त्रो, भारतीय सैन्य यापासून ते अध्यात्म असे अनेक आयाम हे नाट्यप्रसंगातून सादर झाले. एस.पी.एम.इंग्लिश स्कूलच्या बालवाडी ते 9 वी पर्यंतच्या 1 हजार 100 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. महानाट्यामध्ये नांदी, भारुड, बुरगुंडा, पोवाडा, सवालजवाब,
मंगळागौरीचे खेळ, धनगरी नृत्य, शेतकरी नृत्य, वारीचे अभंग, बतावणी आदींद्वारे भारतीय लोककलेचे दर्शन देखील झाले. महानाट्याची संकल्पना शाळेच्या मुख्याध्यापिका रमा कुलकर्णी यांची आहे.