थेऊर -हवेलीच्या पूर्व भागातील थेऊर, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबा, नायगाव, पेठ, तरडे, वळती, लोणी काळभोर, अष्टापूर, भवरापूर व हिंगणगाव या भागात सतत बदलणाऱ्या वातावरणाचा कांदा पिकाला फटका बसत आहे.
वाढलेला जोर आणि पहाटे पडणाऱ्या धुके व दवबिंदूमुळे गहू आणि कांद्यावर रोगांचा प्रादूर्भाव वाढला आहे. यामुळे तीन दिवसाआड औषध फवारणी करावी लागत आहे. यासाठी महागडी औषधे खरेदी करावी लागत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
अचानक हवामानात झालेला बदल आणि त्या अनुषंगाने रोगांचा प्रादुर्भावदेखील मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. शहरासह ग्रामीण भागातील पीके सध्या धोक्यात आली आहेत.
पीक वाचविण्यासाठी महागडी औषधे फवारणी केली जात आहे. कांदा, गहू, हरभरा आदी पिके जोमात आहे. हरभरा, गहू आणि कांदा पोसण्यास सुरू झालेली असतानाच वातावरणातीस बदलामुळे रोग पडू लागला आहे. यामुळे रोपांची वाढही खुंटली आहे.
हातातोंडाशी आलेली पिके वाचविण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत. आठवडाभरापासून थंडीमध्ये वाढ झाली आहे. शिवाय पहाटे धुके आणि दवबिंदूमुळे गहू, हरभरा पिकावर विविध रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे महागडी औषध फवारणी करावी लागत आहे.
-बाळासाहेब गायकवाड शेतकरी, कोलवडी