-अमृता कुलकर्णी
प्रिय, पुणे
पत्रास कारण की,
मनातील भावना ह्या योग्यवेळी व्यक्त झाल्याच पाहिजे. तुझी अशी अवस्था बघवत नाही रे…
दगडूशेठ गणपती, तुळशीबाग, टिळक रोड, सगळं भकास झालंय विसरलास का? गणपतीच्या मिरवणुकीत नाचायचं आणि बाप्पाचं सगळ्यांनी दर्शन घ्यायचं. आता तुला बरं व्हायचंय आणि पुन्हा तुला गजबजलेले बघायचं आहे.
खडकवासलातला पाऊस, टपरीवरचा वाफळता गरम गरम चहा, गरम भजी… त्याच्या जोडीला भाजलेले मसालेदार कणीस हे तुझ्यासोबत अनुभवयाचे आहे. त्यासाठी तुला बरं व्हायचं. स्वप्न पाहणाऱ्याचे अन् ते सत्यात उतरवण्यासाठी धडपडणाऱ्यांचे शहर… त्यांची स्वप्न पूर्ण करायला तुला लवकर बरं व्हायचंय…
विद्येचे माहेरघर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुला बरं व्हायचंय. पाणीपुरी, भेळपुरी, पावभाजी, पुण्याची शान मिसळपाव हे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी तुला बरं व्हायचचं आहे. दहीहंडी, ढोल, ताशा, गजर, बाप्पाचे आगमन, मिरवणूक, दिवाळीचा थाट या सगळ्यांनी तुला नटलेले पाहायचे त्यासाठी तुला बरं व्हायचयं.
सारसबाग, केळकर संग्रहालय, मंदिरे, हॉटेल्स, भीमथडी जत्रा, चित्रपट, नाट्यगृहे असं मायानगरी शहर असलेले तुला असं थकलेले, शांत झालेले पाहायची सवय नाही. वाट पाहताहेत माझ्यासारखे सगळे पुणेकर, मुक्त भरारी घेण्याची पुन्हा नव्याने जगण्याची…; “पुणे तेथे काय उणे’ असं आमचं लाडकं पुणे शहर तुला आता लवकर बरं व्हायचंय.
तुझ्या लेकरांना कुशीत घेण्यासाठी, त्यांना अंगाखांद्यावर खेळवण्यासाठी, त्यांचे लाड, हट्ट पुरवण्यासाठी तुला बरं व्हायचं आहे. त्यांचा राग, रुसवा घालवण्यासाठी तुला लवकरं बरं व्हायचंय… त्यांचे भीतीने थरथरणारे अंग शांत करण्यासाठी तुला बरं व्हायचंय… तू थांबला अन् सर्व पुणेकर थांबले… त्यामुळे तू मरगळ झटकून पुन्हा ताजातवाना हो, तू आजारातून बरा झाला की सर्व पुणेकर उल्हासित होतील… त्यांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य आणि गालावर पडणाऱ्या खळीत पावसाचा थेंब साचू दे… त्यासाठी तुला लवकर बरं व्हायचं आहे.
तुझी लाडकी,
अमृता (एक पुणेकर)