पुणे -खासगी वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे शहरात वाहतूक कोंडी तसेच प्रदूषणाची समस्या गंभीर होत आहे. अशा स्थितीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची गरज असताना, त्याचाच एक भाग असलेल्या बीआरटी सेवेवर वाहतूक कोंडीचा ठपका ठेवत ती बंद करण्याच्या मागण्या केल्या जात आहे. ही बाब सर्वस्वी चुकीची असून, याउलट बीआरटी मार्ग अधिक सक्षम करून त्याचा वापर वाढविणे गरजेची असल्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार ऍड. वंदना चव्हाण यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पीएमची अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे केली आहे.
खासदार ऍड. चव्हाण यांनी केलेल्या मागणीनुसार, पुण्याचे झपाट्याने शहरीकरण होत असतानाच खासगी वाहनांची संख्या वाढत आहे. पुणे शहरात सध्या कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. पुण्यातील प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणे हा एकमेव उपाय आहे. लोकांना खासगी वाहनांपासून दूर राहण्यास आणि सार्वजनिक वाहतूक वापरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी काम होणे अपेक्षित आहे. याच उद्देशाने बीआरटी सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र बीआरटी मार्गाचे बसचे जाळे आणि एकूण फेऱ्यांची संख्या समाधानकारक नाही. त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. बीआरटीच्या वापरामुळे कार्बन उत्सर्जन कमी होते. ज्यामुळे ट्रॅफिक कॉरिडॉरमुळे होणाऱ्या आजूबाजूच्या परिसरात व पर्यायाने शहरातील प्रदूषणाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे ही सेवा बंद न करता ती अधिक सक्षम कशी बनवता येईल, बसची संख्या आणि त्याच्या फेऱ्या कशा वाढवता येतील, याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ऍड. चव्हाण यांनी केली आहे.