निमोणे – मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर युवा संघर्ष यात्रा तूर्तास स्थगित केली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिली. निर्वी (ता. शिरूर) येथे पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, रोहित आर. आर. पाटील, जयदेव गायकवाड व राज्यातील विविध जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पवार यांनी हा निर्णय जाहीर केला.
पवार म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात सध्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा निर्णय घेतला. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण अस्वस्थ झाले आहे. अशा परिस्थितीत राज्यातील शांतता धोक्यात येऊ नये, यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.
ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी येथे आले, पण त्यांनी मराठा आरक्षणावर एक शब्द काढला नाही. मनोज जरांगेंची प्रकृती ढासळत चालली आहे. ते प्रामाणिकपणे समाजासाठी लढत आहेत. राज्य सरकार मराठा, धनगर समाजाच्या बाबतीत संवेदनशील नाही. आम्ही ही यात्रा युवा हितासाठी काढली.
अस्वस्थ युवकांसाठी यात्रा काढली
गावबंदीच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा थांबवता आहात का, या प्रश्नावर पवार म्हणाले की, गावबंदीच्या निर्णयावर हा निर्णय घेतला नाही, आज महाराष्ट्र अस्वस्थ आहे. या यात्रेदरम्यान एका गावात मी स्वतः सर्वांना भेटलो. तेव्हा आम्ही मराठा आरक्षणावर ठाम असल्याचे सांगितले. तेव्हा सर्वजण आमच्याबरोबर काही अंतर चालले. मी गावबंदीमुळे स्थगिती केली नाही. ज्यांच्यासाठी ही यात्रा काढली. ते युवा अस्वस्थ असताना ही यात्रा सुरू ठेवणे योग्य नाही. राज्यातील युवक आत्महत्या करीत असतील. राज्यातील वातावरण अस्वस्थ असेल. त्या राज्यसभा संवेदनशील असेल, तर अशा परिस्थितीत यात्रा सुरू ठेवणे योग्य नाही.
“विशेष अधिवेशन बोलवावे’
दरम्यान, पंतप्रधानांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री अथवा मुख्यमंत्री यांनी मराठा आरक्षणावर काहीही बोलले नाहीत. पत्रकारांच्या एका प्रश्नांवर ते म्हणाले, मुळात राज्य पेटले असताना तिकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदी मिळणार, यात गर्क आहेत, हे अतिशय दुर्दैवाचे आहे. मराठा आरक्षणाविषयी हे सरकार खरोखरच गंभीर असेल तर आता राज्य व केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे, नवी संसद दाखवायला तुम्ही विशेष अधिवेशन घेता. मग आता महाराष्ट्र पेटला असताना तुम्ही का अधिवेशन बोलवत नाही, असा खडा सवाल त्यांनी केला.