राजगुरूनगर: शिरूर लोकसभा मतदारसंघ अलीकडे चर्चेचा विषय आहे. सगळ्यांनी त्यावर खूप प्रेम केले आहे. जो काही आपला निर्णय आहे तीन पक्ष जो निर्णय घेतील तो मान्य असेल पण मी एक सांगेल खासदारकीसाठी मी आक्रोश करणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आमचा विश्वास आहे. पण आक्रोश करणार नाही ज्यांना खासदारकीची आक्रोश करायचा त्यांनी करावा, असा टोला शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे नाव न घेता त्यांनी काढलेल्या आक्रोश मोर्चाबाबत लगावला.
मिशन 48 शिवसंकल्प अभियान सुरुवात व कार्यकर्ता मेळावा राजगुरूनगर येथे शनिवारी (दि. 6) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी आढळराव बोलत होते. ते म्हणाले की, धर्मवीर संभाजी महाराज स्मारकासाठी 400 कोटींचा आराखडा मंजूर केला त्याचा नारळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या हस्ते फोडावा अशी शंभू भक्तांची मागणी आहे.
पुणे-नाशिक रेल्वे मार्गाच्या कामात प्रगती नाही त्यात मुख्यमंत्र्यानी लक्ष घालावे. कळमोडी प्रकल्प योजनेत लक्ष घालावे. भामा आसखेड प्रकल्प ग्रस्तांना वाढीव मोबदला मिळावा भात पिकाला अर्थसहाय्य व चांगली बाजार पेठ मिळावी यासाठी प्रयत्न व्हावेत. देवस्थान जोडणारे निधी मिळवा. पर्यटनासाठी चांगला वाव आहे त्यासाठी निधी मिळावा अशी मागणीत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
…मात्र मी थांबलो नाही
शिवसेनेचे मिशन 48 आहे तसे माझे पण मिशन शिरूर मतदारसंघाचा विकास हे आहे. माझा मागील निवडणुकीत पराभव झाला; मात्र मी थांबलो नाही विकास करत राहिलो. मतदार संघात पाच वर्षे वणवण फिरत आहे. जेथे पराभव झाला त्या संघात पुन्हा नव चैतन्य मिळवून द्यायचे आहे. पाच वर्षांच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद मिळाली त्यामुळे मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लावण्यात यश आले.