रमेश जाधव
रांजणी – दिलीप वळसे पाटील यांची राज्य सरकारमध्ये एन्ट्री झाल्याने त्यांचे राजकीय विरोधक शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची धाकधूक वाढली असून ते व त्यांचे कार्यकर्ते पूर्णपणे गोंधळून गेले आहे. इकडे आड तिकडे विहीर अशीच त्यांची बिकट अवस्था सध्या झाल्याचे पहावयास मिळते.
2004 पूर्वी शिवाजीराव आढळरावपाटील व वळसे पाटील एकेकाळचे मित्र दिलीप वळसे पाटील हे मंत्री झाल्यानंतर भीमाशंकर कारखान्याचा राजीनामा देऊन अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून त्यांनी अत्यंत विश्वासाने भीमाशंकर कारखान्याच्या अध्यक्षपदाची माळ आढळराव पाटील यांच्या गळ्यात घालण्याचे काम त्यावेळी केलं होतं. भीमाशंकरचे अध्यक्ष झाल्यानंतर आढळराव पाटील यांच्या आशा पल्लवीत झाल्या.
पूर्वीच्या खेड लोकसभा मतदारसंघातून खासदारकीला तिकीट मिळावे म्हणून त्यांनी फार प्रयत्न केले. पण त्यात त्यांना यश आले नाही. त्यावेळी पुणे जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष व त्याकाळचे खासदार अशोकराव मोहोळ यांनाच उमेदवारी देण्यात आली. या प्रकाराने कमालीचे नाराज झालेले आढळराव पाटील यांनी थेट मुंबईला मातोश्रीचा रस्ता धरला. शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांचे त्यांना आशीर्वाद मिळाले. तसे त्यांना निवडून येणे फार अवघड होते. पण चाकण येथे झालेल्या जाहीर सभेत शिवसेनाप्रमुखांनी दिलेल्या हाकेला मतदारसंघातील जनतेने पाठिंबा दिला.
18 ते19 हजारांच्या मताधिक्याने आढळराव पाटील खासदार झाले. त्यानंतर मात्र वळसे पाटील विरुद्ध आढळराव पाटील असा संघर्ष कमालीचा वाढत गेला. वळसे पाटील यांचा विजयी रथ रोखण्यासाठी आंबेगाव – शिरूर विधानसभा मतदारसंघात आढळराव पाटील यांनी स्वतःच्या धर्मपत्नी कल्पनाताई आढळराव पाटील यांनाही मैदानात उतरवले होते. पण त्यात त्यांना यश आले नाही. विकासकामांचा डोंगर उभा केलेले वळसे पाटील यांनाच मतदारांनी साथ दिली.
त्यानंतर अरुण गिरे, राजाराम बाणखेले यांनाही आढळराव पाटील यांनी ताकद दिली. पण कुणाचाही टिकाव वळसे पाटील यांच्या पुढे लागला नाही. राजाराम बाणखेले सध्या आढळराव पाटील यांचे विरोधक म्हणून ओळखले जातात. पुणे जिल्हा शिवसेनाप्रमुख सुरेश भोर यांनी तर आढळराव पाटील यांच्या विरोधात उघडपणे दंड थोपटले आहेत. सध्या भोर हे मातोश्रीचे अत्यंत निकटवर्ती म्हणून ओळखले जातात. ज्येष्ठ नेते सचिन अहिर, रवींद्र मिर्लेकर यांच्या माध्यमातून ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या फार जवळ पोहोचले आहेत.
भल्याभल्यांचे डाव उधळले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघात ताकद वाढवण्याचा व शिरूरमधून पुन्हा खासदारकीची निवडणूक लढविण्याचा चंगच आढळराव पाटील यांनी बांधला होता. पण आता मात्र गणित पूर्णपणे बिघडले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व दिलीप वळसे पाटील या संताजी धनाजीच्या जोडी पुढे आढळराव पाटलांच काय होणार, या चिंतेतच त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते आहेत. राजकीय भूकंप झाल्याने भल्याभल्यांचे राजकीय स्वप्नांचे डाव उधळले गेले आहेत. त्यामुळे आढळराव पाटील यांची इकडे आड व तिकडे विहीर अशीच सद्यस्थिती झाली आहे.