पुणे – राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांकडून बुधवारी (दि.5) मुंबई येथे मेळाव्याचे आयोजन केले आहे. या दोन्ही मेळाव्यांना उपस्थित राहण्यासाठी जिल्हाध्यक्ष तसेच तालुकाध्यक्ष यांना फोन करण्यात येत आहेत. त्यामुळे कोणत्या गटाकडे जायचे, असा प्रश्न जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना पडला आहे. यावर काही पदाधिकाऱ्यांनी या दोन्ही गटांच्या बैठकीला जाण्याचा पवित्रा घेतला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील घडामोंडीनंतर शरद पवार, की अजित पवार यांच्यापैकी कोणासोबत जायचे? अशा संभ्रमावस्थेत राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षांची तसेच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची मंगळवारी धनकवडी येथील कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीनंतर गारटकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. “राज्यात घडलेल्या सत्तानाट्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षांची बैठक घेण्यात आली. बैठकीला पाच तालुक्यांचे अध्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. त्यातील काहींच्या स्थानिक स्तरावर बैठका सुरू असल्याचे सांगण्यात आले.”
पुढे ते म्हणाले, “बैठकीमध्ये शरद पवार की अजित पवार यांच्यासोबत जायचे? याबाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय झाला नसून, लवकरच निर्णय जाहीर केला जाईल. दरम्यान, बुधवारी मुंबईत शरद पवार आणि अजित पवार यांनी बैठक आयोजित केली आहे. त्या दोन्हीपैकी कोणत्या बैठकीला जायचे? असा प्रश्न पदाधिकाऱ्यांसमोर आहे. पण, मी दोन्ही बैठकीला जाणार आहे,” अशी भूमिका गारटकर यांनी यावेळी मांडली.
कार्यकर्त्यांचा अभिमन्यू…
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता आमच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासाठी शरद पवार श्रीकृष्ण यांच्या रूपात आहेत आणि अजित पवार अर्जुनाच्या रूपात आहेत, तर आम्हा कार्यकर्त्यांचा अभिमन्यू झाला असून, आम्ही शरद पवार यांचे की अजित पवार यांचे? या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण झाले असल्याचे गारटकर यांनी सांगितले.