“प्रभात’च्या वृत्ताची पाटबंधारे खात्याने घेतली दखल
बेल्हे – “कुकडी नदीचे पात्र कोरडे ठणठणीत’ या मथळ्याखाली दैनिक “प्रभात’ने मंगळवारी (दि. 7) वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची पाटबंधारे खात्याने दखल घेऊन कुकडी नदीला पाणी सोडल्याने नागरिक व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करून “प्रभात’चे आभार मानले.
जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील कुकडी नदीलगत असलेल्या गावांच्या शेतातील उभी पिके पाण्याअभावी जळू लागली होती. तसेच गावांमधील सार्वजनिक पिण्याच्या पाण्यासह कृषीपंप बंद होऊन पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहिले होते.
पिंपळवंडी, कांदळी, नगदवाडी, वडगाव कांदळी, आळे ,साळवाडी बोरी, सुलतानपूर,शिरोली, निमगावसावा आदी गावे व शेती ही कुकडी नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत; परंतु काही दिवसांपासून कुकडी नदीचे पात्र कोरडे पडले होते. त्यामुळे शेतीला पाणी द्यायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता, त्यात पाण्याअभावी शेतातील पिके जळू लागली होती. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही उभा राहिला होता.
“धरण उशाला, कोरड घशाला’ अशी अवस्था कुकडी नदीकिनारी गावांची झाली होती. “प्रभात’ने याबाबत सविस्तर बातमी दिली होती. त्यामुळे पाटबंधारे खात्याकडून कुकडी नदीला पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी मिळणार असल्याने नागरिकांनी व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.