* संगनमताने विकास निधीचा अपहार
* दर्जाहिन कामे
* वैयक्तिक हेवेदावेमुळे विकास खुंटला
* नागरिकांच्या तक्रारी
वेल्हे – वेल्हे तालुक्यातील सर्वच गावांतील ग्रामपंचायतींमध्ये सरकारच्या विविध विभागांतून विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी येत आहे. मात्र, अनेक ठिकाणी सरपंच, ग्रामसेवक व ठेकेदार यांचे संगनमताने या निधीत अपहार होत असून, कित्येक कामे दर्जाहीन होत आहेत. स्थानिकांनी दर्जाहीन कामे व होत असलेल्या भ्रष्टाचाराची वारंवार चौकशीची मागणी करूनही ती होत नाही, उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे वेल्ह्याची ओळख विकासापासून वंचित तालुका अशीच राहते का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
केंद्र, राज्य सरकार, जिल्हा परिषद आणि स्थानिक करांच्या माध्यमातून ग्रामपंचायतींमध्ये मोठ्या प्रमाणात निधी जमा होत आहे. काही स्वंसेवी संस्थाही तालुक्यात पर्यावरणपूरक व शैक्षणिक कामे घेऊन उतरल्या आहेत. मात्र तरीही शासकीय निधीमध्ये अनेक ठिकाणी अपहार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अंतर्गत राजकारणामुळे आणि वैयक्तिक हेवेदावे यामुळे सर्वाधिक गावांमध्ये विविध कारणास्तव विकासनिधी अडवण्यात येत आहे. तालुक्यात सर्वाधिक गावांमध्ये दर्जाहीन कामे झाली असून, नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. मात्र कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात येत नसल्याचे चित्र वेल्ह्यात पाहायला मिळत आहे.
लाशीरगाव ग्रामपंचायतीमध्ये फर्निचरच्या नावाखाली जीएसटीची खोटी बिले देऊन अपहार झाला आहे. जो जीएसटी नंबर दिला आहे तो 2019 लाच कालबाह्य झाला आहे. याबाबत ज्या दुकानदारांनी खोटी बिले दिली त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे किंवा त्यांचा नावाचा वापर करून ज्यांनी बिले काढली त्यांना निलंबित करावे.
अजित आधवडे, सामाजिक कार्यकर्ते, लाशीरगाव
ग्रामविकासात नियोजनबद्धता असल्यास अडचणी येत नाहीत. काही वाद असतील तर ते सामोपचाराने सोडविले पाहिजेत अन्यथा गावखेडी विकासापासून वंचित राहतील. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने जी गावे विकासकामे करून घेण्यात अग्रेसर आहेत त्यांनाच सर्वाधिक विकासनिधी दिला पाहिजे. ज्या ठिकाणी अडचणी येत आहेत त्यांचे प्रबोधन केले पाहिजे म्हणजे आलेला पैसे खर्च झाला नाही म्हणून परत जाणार नाही.
गुलाब रसाळ,सरपंच, गुंजवणे