पुणे – वीजेअभावी योजना बंद पडण्याची समस्या दूर करण्यासाठी सौर ऊर्जेवर योजना राबवावी. “हर घर जल’ योजनेचे उद्दिष्ट निर्धारित वेळेत पूर्ण करावे. पाणीपुरवठा योजनेची कामे चांगल्या दर्जाची होतील व योजना बंद पडणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
पवार यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजना, जलजीवन मिशन, हर घर जल योजना आणि नळजोडणी कामांचा आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधीक्षक अभियंता वैशाली आवटे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, “महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कालबद्ध नियोजन करून योजना लवकर पूर्ण कराव्यात. पाणी वितरणासाठी पाइप चांगल्या दर्जाचे वापरावे. जीवन प्राधिकरणाला जागा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्यात येईल.’