पिंपळे गुरव – पवना नदीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस भर पडत आहे. सध्या नवरात्रोत्सवानिमित्त पवना नदी किनारी भागात मोठ्या प्रमाणावर गोदड्या, गाड्या धुतल्या जात आहेत. तर अनेक ठिकाणी ड्रेनेजलाइनचे पाणी थेट पवना नदीपात्रात जात असल्याने पवनेचे आरोग्य मोठ्या प्रमाणावर बिघडले आहे. दापोडी येथील दफनभूमी परिसरात देखील ड्रेनेजलाइनचा चेंबर तुटल्याने मोठ्या प्रमाणावर दूषित पाणी थेट पवना नदीत मिसळत आहे. त्यामुळे येथील चेंबरची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
पवना नदी किनारी तुटलेले चेंबर, भेगा पडलेली सीमाभिंत, वाढलेले गवत, दुर्गंधी आदींमुळे दापोडीतील मुस्लिम दफनभूमीला समस्यांचे ग्रहण लागले आहे. जागा असूनही प्लॅटफॉर्म अभावी दफनविधीसाठी जागा अपुरी पडत आहे.
महापालिकेच्या वतीने दहा वर्षांपूर्वी या मुस्लिम दफनभूमीचे नूतनीकरण करण्यात आले होते. त्यानंतर आजतागायत दफनभूमीची पुरती दुर्दशा झाली आहे. भेगा पडलेली सीमाभिंत कधी कोलमडेल हे सांगता येत नाही. दफनभूमीच्या शेजारी असलेल्या ड्रेनेजलाइनचा चेंबर तुटल्याने दूषित पाणी थेट पवना नदीत मिसळत आहे. फुटलेल्या चेंबरमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
दफनभूमीकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने मोठ्या प्रमाणावर गवत वाढले आहे. या गवतामध्ये विषारी प्राणी असल्याने स्थानिक वाचमनच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. प्रवेशद्वाराजवळ वाचमन राहत आहे. त्यांनाही सर्व समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे समस्यांचे आगार असलेल्या दफनभूमीत अंत्यविधी कसा करायचा असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
मुस्लिम समाजातील मृत व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी जागा अपुरी आहे. मोकळी जागा असूनही त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म बनविण्यात आले नसल्यामुळे दफनविधी करताना अडचण येत आहे. महापालिकेकडून मोकळ्या जागेत नवीन प्लॅटफॉर्म लवकरात लवकर बनविण्याची गरज आहे. प्रवेशद्वारा जवळील सीमाभिंतीचे नूतनीकरण करण्यात यावे. महापालिकेच्या संबंधित प्रशासनाने या सर्व समस्यांची दखल घेऊन लवकरात लवकर प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
सद्यस्थितीत मुस्लिम दफनभूमीत समस्या वाढल्या आहेत. परिसरातील नागरिक याबाबत विचारणा करीत आहेत. अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे समस्या मांडल्या. मात्र संबंधित प्रशासनाने या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे.
– रोहित काटे, माजी नगरसेवक.
मुस्लिम समाजातील मृत व्यक्तींच्या दफनविधीचा प्रश्न गंभीर बनला आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत. प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे. या समस्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासनाने येथील चेंबर आणि दफनभूमीची स्वच्छता करावी.
– फईम शेख, दापोडी.